सोयगाव : शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली असतानाच या रस्त्यांवरील धुळीने नागरीक हैराण झाले आहेत. प्रमुख रस्त्यांवरील धुळधाण डोकेदुखी ठरत असून, नागरीकांना विविध श्वसन विकारांचा सामना करावा लागत आहे. जुना मुंबई - आग्रा महामार्ग तसेच मालेगाव ते सटाणा रस्त्यावरून दररोज सर्वाधिक वाहने धावतात. या रस्त्यांवरील प्रवास म्हणजे प्रवासानंतर अंघोळ करणे आवश्यक असल्याची प्रचिती देतो. महापालिका प्रशासनाने स्वाईप मशीन घेण्याचा ठराव केला आहे. शहरात त्याचे प्रात्यक्षिकेही झाले. हे यंत्र केव्हा शहरात येणार व धुळ कशी कमी होणार, याचीच उत्सुकता आहे.
नवीन बसस्थानक ते दरेगावपर्यंतचा टप्पा गाठण्यासाठी वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन तारेवरची कसरत केल्याप्रमाणे प्रवास करावा लागत आहे. आधीच उड्डाणपुलाचे काम खोळंबले असून, त्याचा उपयोग राजकीय बॅनरबाजीसाठी होत आहे. त्यात रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे सुरू असलेल्या कामाचा वेगही थंडावला आहे. त्याच अंतरादरम्यान पावसाळ्यात पडलेले खड्डे, बेशिस्त वाहतुकीमुळे हा रस्ता कधी पूर्ण होतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सटाणा नाका, मौसम चौक परिसरात तर धुळीचा प्रश्न कायमचाच आहे.
रस्त्य्यालगतच्या रहिवाशांना रोज धूळ व वाहनांचा कर्णकर्कश आवाजाचा सामना करावा लागतो. वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीने पायी चालणाऱ्या व्यक्तीला तोंडाला रुमाल बांधून चालावे लागते. शहराकडे शिक्षणासाठी सायकलवर येणाऱ्या महाविद्यालयीन मुला - मुलींना देखील मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो. या रस्त्यालगत वाहतुकीची नेहमी कोंडी होते. सायंकाळच्या वेळेला तर मोठ्या वाहनांमुळे खूप धूळ उडते. या धुळीचा लहान मुले व ज्येष्ठांना प्रचंड त्रास होत आहे. तर टेहेरे चौफुली ते चर्च गेटपर्यंतच्या रस्त्यावर चालणेदेखील जिकरीचे झाले आहे. भुयारी गटारीच्या कामामुळे रस्त्याची दुरवस्था झाली. त्यामुळे वाहनधारक, व्यावसायिक व पादचाऱ्यांना धुळीचा सामना करावा लागतो.
शहरातील रस्त्यांवर धुळीमुळे छोटे - मोठे अपघातही घडत आहेत. अनेकांना या धुळीमुळे अॅलर्जी असल्याचे समोर आले असून, रुग्णालयाचा रस्ता धरावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी तोंडाला मास्क वापरण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे त्वरीत बुजवून व डांबरीकरणे करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यावरील धुळीमुळे विकार जडत असून, टेहरे चौफुली ते चर्च गेटदरम्यानच्या रस्त्यावर दिवसभर धुळीमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. संबंधित विभागाने याप्रश्नी तोडगा काढून रस्त्याचे काम तत्काळ करावे. सायंकाळच्या वेळी तर धुळीमुळे पायी चालणेदेखील मुश्किल होत आहे.
- भास्कर पवार, नागरिक
धुळीमुळे नागरिकांमध्ये श्वसनाचे विकार जडत असून, शून्य ते पाच वयोगटापर्यंतच्या लहान बालकांनादेखील मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचे दिसून येते. धुळीमुळे लहान मुलांना दमा तर वृद्धांना श्वास घेण्यास त्रास होवून अस्थमाचे विकार जडतात. धुळीचे प्रमाण परिसरात अधिक वाढले आहे. श्वसन, फुफ्फुस व डोळ्यांचे गंभीर आजार बळावत आहे.
- डॉ. सचिन बोरसे, मालेगाव
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.