Summer Heat : वन्यजीव मानवी वस्तीत; पशूधन धोक्यात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

thirsty animals run to human settlements

Summer Heat : वन्यजीव मानवी वस्तीत; पशूधन धोक्यात!

किकवारी बुद्रुक (जि. नाशिक) : उन्हाच्या (Summer) वाढत्या प्रकोपाने नैसर्गिक जलस्रोत व पाणवठे कोरडे पडण्यास सुरवात झाल्याने वन्यजीवांना तहान भागविण्यासाठी मानवीवस्तीकडे धाव घ्यावी लागत आहे. (natural water sources water bodies dry up due to increasing heat of summer wildlife has to run to human settlements for thirst nashik news)

बागलाण तालुक्यात सध्या सर्वत्र हे चित्र दिसून येत असून, वन्यजीवांच्या हल्ल्यात पाळीव प्राण्यांचा बळी जात असल्याने बळीराजाला मात्र नाहक आर्थिक फटका सोसावा लागत आहे.
शासनाच्या धरसोडीच्या आयात-निर्यात धोरणामुळेच शेतीव्यवसाय तोट्यात जात असल्याने, तालुक्यातील शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात.

यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांकडून म्हैस, गाय, बकरी या पाळीव जनावरांचा सांभाळ केला जातो. मात्र, वाढत्या हल्ल्यांमुळे पशूधन धोक्यात आले आहे. नुकसान झाल्यानंतर मात्र बळीराजाच्या पदरी तोकडी रक्कम पडत असल्याने थोड्याफार प्रमाणात मदतीचा हात शासनाकडून दिला जातो. तरीदेखील बळीराजाला आर्थिक फटका सोसावा लागत आहे.

राखीव वनपरिक्षेत्रात आश्रय

मानवाने अतिहाव्यासापायी वन्यजीवांच्या हक्काच्या अधिवासावर अतिक्रमण करून आपल्या सोयीनुसार त्याचा वापर करण्यास सुरवात केली. मात्र, बागलाण तालुक्यात शासनाच्या संयुक्त वनव्यवस्थापन मोहीमेंतर्गत बऱ्याच भागातील डोंगरांवर अधिग्रहण करून, तेथे वृक्ष लागवड करण्यात आली आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

या राखीव वनपरिक्षेत्रात आता वन्यजीवांनी आश्रय घेतला आहे. दिवसभर याठिकाणी वास्तव्य करून हे वन्यजीव रात्री पोटाची खळगी भरण्यासाठी व घोटभर पाण्यासाठी मानवीवस्तीकडे धाव घेतात.

पशूधन धोक्यात

गेल्या काही दिवसांचा लेखाजोखा पाहता वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेक पाळीव प्राणी ठार झाल्याच्या नोंदी वनविभागात झाल्या आहेत. यात प्रामुख्याने बकरी, शेळी, बोकड, कालवड, शिंगरू या बरोबरच पाळीव कुत्रा यांचाही समावेश आहे. त्यातही तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यासारखे हिंस्त्र पशू नागरिकांच्या दृष्टीस पडले आहे. अनेकवेळी दिवसाही या प्राण्यांचे दर्शन होते. त्यामुळे नागरिकांत घबराट निर्माण होत असल्याचे पाहावयास मिळते.

ठोस कारवाईची गरज

दरम्यान, याबाबत वनविभाकडून माहीती घेतली असता, तालूक्यात अद्याप एकही नरभक्षक बिबट्याचा अधिवास आढळून आला नसल्याचे सांगण्यात येते. आता उन्हाळा सुरू झाल्याने वनविभागाकडून या वनपरिक्षेत्रात वन्यजीवांसाठी पाण्याची सोय उपलब्ध करणे गरजेचे आहे.

यासाठी तालुक्यातील संयुक्त वनव्यवस्थापन समिती व निसर्गमित्रांना सोबत घेत संयुक्तिक प्रयत्न होणे गरजेचे झाले आहे. यासाठी आश्‍वासनांचा पाऊस नको, तर प्रत्यक्षात त्वरित कारवाई करून मानव व वन्यजीवांचा हा संघर्ष थांबवणे काळाची आहे.

तालुक्यातील वनपरिक्षेत्रात वन्यजीवांचा वावर वाढला आहे. ही निसर्गाच्या जीवनसाखळीसाठी आनंदाची बाब आहे. वाडवडीलांकडून ऐकलेल्या वन्यजीवांच्या गोष्टी नवीन पिढीला प्रत्यक्षात पाहावयास मिळत आहेत.

"आमच्या निसर्ग मित्र संघटनेमार्फत तालुक्यातील वनपरिक्षेत्रात तात्पुरत्या स्वरुपात वनतळ्यांची निर्मिती करण्यात येणार असून, बाकी सर्व ठिकाणी लवकरच पाण्याची सोय करण्यात येईल." -राकेश घोडे, अध्यक्ष, निसर्ग व प्राणी मित्र संघटना, बागलाण