
Nitin Gadkari | पिकांची नव्हे, तर पैशांची करा शेती! : नितीन गडकरी
नाशिक : जागतिक अर्थव्यवस्थेचा आपण एक भाग आहोत. या दृष्टीने शेतीकडे पहावे. मागणी आणि पुरवठा याचे गणित लक्षात घ्यावे. तसेच पिकांची नव्हे तर पैशांची शेती करावी, संशोधनावर भर द्या. त्याला उद्योजकतेची जोड द्यावी.
‘सह्याद्री’ हे काम करत आहे. प्रत्येक जिल्ह्यात अशा शेतकऱ्यांच्या संस्था झाल्यातर देश जगात पहिल्या क्रमांकावर पोचेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते -महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. (Nitin Gadkari statement at sahyadri farms biogas project opening nashik news)
सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या मोहाडी (ता. दिंडोरी) येथील प्रांगणात शनिवारी (ता. १८) बायोगॅस प्रकल्पाचे उदघाटन श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी झालेल्या फलोत्पादक शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, ज्येष्ठ नेते सुरेश बाबा पाटील, महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे उपस्थित होते.
श्री. गडकरी म्हणाले, शेतकरी एकत्र आले तर कसा चमत्कार होऊ शकतो, याचे सह्याद्री हे एक आदर्श उदाहरण आहे. स्वत:च्या हिमतीवर शेतकरी निर्यात करताहेत. मालाला चांगला भाव मिळवताहेत. हे एक स्वप्न तुम्ही कृतीत उतरवून दाखवले आहे. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात जर अशी ‘सह्याद्री’ निर्माण व्हावी. तसेच आपण ‘ग्लोबल इकॉनॉमी’ मध्ये आहोत.
तुम्ही स्वत: तुमचे संशोधनाचे काम करा. त्यात नफ्याची शक्यता अधिक आहे. कलमे विकून जास्त पैसा कमावता येतो. हायब्रीड करणे, टिश्यू कल्चर हे तंत्रज्ञान उपयुक्त आणि लाभदायी आहे. फळांचे रस, ज्यूस आणि इतर मूल्यवर्धन करणे हे तंत्रज्ञान आहे. ‘सह्याद्री’ यातही काम करीत आहे हे कौतुकास्पद आहे.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
जिद्दीने शेती करणारे तरुण शेतकरी ही या भागाची ओळख आहे. अवकाळी पावसाने शेती जशी अडचणीत आली आहेत. तशी शेतमजूरही अडचणीत आले आहेत. त्यांच्या निवाऱ्याबाबत व्यवस्था करावी, असे श्री. झिरवाळ यांनी सांगितले.
श्री. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, राज्यात ऊसशेती आणि दुग्ध व्यवसाय यात ‘इको सिस्टीम' तयार झाली. त्यातून ग्रामीण भागात क्रांती झाली. तशी क्रांती इतर फळपिकांमध्ये होण्याची गरज आहे. जागतिक बाजारपेठ काबीज करण्याची मोठी क्षमता या पिकांमध्ये आहे. त्यासाठी योजनाबद्ध व्यवस्था होण्याची आवश्यकता आहे.
एच-स्क्वेअर इनक्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद राजेभोसले यांनी सूत्रसंचालन केले. सह्याद्री फार्म्स सस्टेनेबल ग्रासरुट इनिशिएटीव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी आबासाहेब काळे यांनी आभार मानले.
द्राक्ष उत्पादकांचा सन्मान
राज्यात द्राक्षशेती रुजवण्यात आणि द्राक्ष उद्योग उभा राहण्यात अनेक जिद्दी द्राक्ष उत्पादकांनी अहोरात्र कष्ट घेतले. त्यातील काही ज्येष्ठ प्रयोगशील द्राक्ष उत्पादकांचा श्री. गडकरी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सन्मानार्थी शेतकरी असे : श्रीराम ढोकरे, डी.बी.मोगल, जगन्नाथ खापरे, अशोक गायकवाड, माणिकराव पाटील, वासुदेव काठे, राजेंद्र ब्रह्मेचा, अरुण मोरे.
३० हजार युनिट वीज निर्मिती
सह्याद्री फार्म्समधून दररोज १५० टनाचे ‘ॲग्री वेस्ट' तयार होते. त्यापासून दररोज १५ हजार घनमीटर गॅस निर्मिती होईल. या गॅसपासून प्रतिदिन ३० हजार युनिट वीज निर्मिती होणार आहे. सह्याद्रीच्या एकूण गरजेच्या ३० टक्के वीज अशा प्रकारे कचऱ्यापासून व सौर उर्जेतून तयार होते.