नाशिक : होळीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात धूलिवंदनाच्या दिवशी निघणाऱ्या वीरांच्या (procession of heroes) मिरवणुकांमुळे मंगळवारी (ता. ७) शहरभर मोठा उत्साह होता. सायंकाळनंतर मोठ्या संख्येने वीरांचे आगमन झाल्याने रामतीर्थावर पाय ठेवायलाही जागा नव्हती. (procession of heroes on day of Dhulivandan in nashik news)
यात भगवान शंकर, प्रभू रामचंद्रांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेले चिमुरडे लक्ष वेधून घेत होते. ढोल- ताशांच्या गजरात निघालेल्या वीरांच्या मिरवणुकांनी परिसरात चैतन्य पसरले होते. यात्रेनिमित्त गंगाघाटावरील मांडण्यात आलेल्या खाद्य व खेळणीच्या स्टॉल्सला मोठा प्रतिसाद मिळाला.
नाशिकमध्ये वीरांच्या मिरवणुकांना प्राचीन परंपरा आहे. त्यात नवसाला पावणारा वीर म्हणून जुन्या नाशिकमधून निघणाऱ्या दाजीबा वीराबद्दल भाविकांत मोठी श्रद्धा आहे. ही मिरवणूक निघाल्यावर रात्री उशिरा रामतीर्थावर पोचते.
वाटेत वीराचे जागोजाग भव्य स्वागत केले जाते. नवसाला पावणारा वीर अशी ख्याती असलेल्या या वीराला मुंडावळ्या वाहण्याची परंपरा आहे. घनकर गल्लीतून निघणाऱ्या येसाजी वीरालाही जुनी परंपरा आहे. हे दोन्ही वीर रामतीर्थावर एकमेकांना भेटतात. शहराच्या विविध भागातून आलेल्या वीरांच्या मिरवणुकीने रामतीर्थ परिसर गजबजून गेला होता.
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
यात्रोत्सवाची रंगत
गंगाघाटावर खेळणीसह विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. त्याला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सायंकाळी सातनंतर म्हसोबा महाराज पटांगण, रोकडोबा मंदिरासमोरील मैदान, खंडेराव महाराज मंदिर परिसर, यशवंतराव महाराज पटांगण, रामतीर्थ येथे पाय ठेवायलाही जागा नव्हती.
चिमुरड्या वीरांसोबत फोटोसेशनसह सेल्फी घेण्यासाठी कुटुंबातील सदस्यांसह तरुणाईची लगबग सुरू होती. वीरांच्या मिरवणुकांमुळे रामतीर्थावर मोठी गर्दी उसळते. त्यात वाहनांमुळे कोंडीही होते, ही कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी रामतीर्थाकडे येणारे रस्ते बॅरीकेटिंगद्वारे बंदीस्त केले होते.त्यामुळे दरवर्षी या भागात होणारी वाहनांची कोंडी टळली. मात्र सरदार चौक भागात गर्दीमुळे अनेक वाहने अडकून पडली होती.
शेवाळामुळे नाराजी
वीरांच्या मिरवणुका रामतीर्थावर पोचल्यावर या ठिकाणी विरोबाला श्रद्धेने स्नान घातले जाते. परंतु सध्या रामतीर्थातील पाणी प्रवाही नसल्याने भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे वीरांच्या मिरवणुका असूनही रामतीर्थातील पायऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर शेवाळ साचले होते, त्या ठिकाणी अनेकजण घसरून पडले. याशिवाय दूषित पाण्यामुळेही अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.