
Rajya Natya Spardha : राज्य नाट्य स्पर्धेच्या निकालाची प्रतीक्षा! महिन्याभरात 29 नाटकांचे सादरीकरण
नाशिक : तब्बल ४० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नाशिकमध्ये पार पडलेल्या ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या निकालाची नाशिककरांना उत्सुकता लागून आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जाते. (Rajya Natya Spardha Waiting for State Drama Competition Results Performance of 29 plays in month nashik news)
नाट्य क्षेत्रातील युवकांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या कलागुणांना बहर यावा म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. मार्च महिन्यात २९ दर्जेदार नाटकांचे सादरीकरण झाले. यात परशुराम साईखेडकर नाट्यगृहात २४, तर महाकवी कालिदास कलामंदिरात १५ नाटके सादर झाली.
गुढीपाडव्याच्या दिवशी आयोजित ‘फक्त एकदा वळून बघ’ हे नाटक ऐनवेळी रद्द झाले. नाशिकमधील नाट्य संस्थांनी ‘शीतयुद्ध सदानंद’, ‘चांदणी’ व ‘इश्क का परच्छा’ हे तीन नाटक सादर केले. याव्यतिरिक्त नाशिकचे लेखक व दिग्दर्शकांनी इतर जिल्ह्यातील संस्थांसोबत काम केले. त्यांचेही सादरीकरण या ठिकाणी झाले.
इतक्या प्रदीर्घ काळानंतर नाशिकमध्ये नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. तत्पूर्वी, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा अर्थात एनएसडी या राष्ट्रीय संस्थेतर्फे आयोजित नाट्य स्पर्धेलाही नाशिककरांनी फारसा उत्साह दाखवला नाही.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
त्याविषयी कलाकारांनी नाराजी व्यक्त तर केली. शिवाय नाट्य क्षेत्रातील मान्यवर मंडळींनाही याविषयी खेद व्यक्त केला. यावरुन नाशिककर रसिक किंवा नाट्यक्षेत्रातील कलावंत किती उदासीन आहेत, याची प्रचिती आल्याचे ज्येष्ठ दिग्दर्शक मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले.
सात लाख रुपये प्रथम पारितोषिक
नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथम पारितोषिक पटकावणाऱ्या नाटकास सात लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाते. तर द्वितीय नाटकास चार लाख रुपये, तृतीय पारितोषिक २ लाख रुपयांचे आहे.
परीक्षक म्हणून सुरेश गायधनी नाशिक, डॉ. संयुक्ता थोरात नागपूर, डॉ. वासुदेव विष्णूपुरीकर मुंबई, राज कुबेर पुणे, रवींद्र अमोणकर गोवा यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांनी आपले परीक्षण सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे पाठवले आहे. येथून विजेत्यांची घोषणा होणार आहे.