
Nashik News: गाव विक्रीला काढलेल्या माळवाडी ग्रामस्थांच्या महसूल प्रशासनाने जाणल्या समस्या
देवळा : तालुक्यातील माळवाडीकरांनी ‘गाव विकणे आहे’ च्या उद्वेगातून केलेल्या ठरावाचे वृत्त सोमवार (ता.६) रोजी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच याची दखल घेऊन आज (ता.७) निवासी नायब तहसीलदार विजय बनसोडे यांनी भेट देऊन उपस्थित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व शासन दरबारी पाठविण्याचे आश्वासन दिले.
कांद्यासह इतर शेतमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. यामुळे शेती व्यवसाय करणे जिकरीचे बनल्याने तालुक्यातील माळवाडी येथील शेतकऱ्यांनी चक्क गावच विकायला काढल्याचा निर्णय घेतला.
याचे वृत्त प्रसिद्ध होताच आज निवासी नायब तहसीलदार विजय बनसोडे यांनी भेट देऊन उपस्थित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत निवेदन स्वीकारले.
यावेळी फुलेमाळवाडीचे सरपंच हिरामण शेवाळे, माळवाडीचे सरपंच शिवाजी बागूल, कांदा उत्पादक शेतकरी अविनाश बागूल, अमोल बागूल, अक्षय शेवाळे, शहाणा बागूल, गणू बागूल, प्रवीण बागूल, महेंद्र बागूल, किशोर बागूल, बाळासाहेब बागूल, राकेश सोनवणे, राजू बच्छाव, तलाठी अमोल येशी, संजय बागूल, अनिल गोसावी आदी उपस्थित होते.