
Sanjay Raut : महाराष्ट्रात धार्मिक तणावाची फॅक्टरी; खासदार राऊत यांचा खळबळजनक आरोप
Sanjay Raut : धार्मिक तणाव निर्माण करून मते मागायची असे प्रकार राज्यात सुरू असून, विरोधक नव्हे तर राज्य सरकारच दंगली घडवत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेच्या उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी करताना सत्ताधाऱ्यांना मतदार भविष्यात स्वीकारतील की नाही,
याची भीती वाटत असल्याने त्यातून देशभरात धार्मिक तणाव निर्माण करणारी फॅक्टरी सत्ताधारी पक्षाने उघडली असून, राज्य अस्थिर करून पुन्हा निवडणुकांना सामोरे जाण्याचे षडयंत्र असल्याचे राऊत म्हणाले. (Sanjay Raut Sensational allegation statement Factory of Religious Tension in Maharashtra on bjp nashik political news)
नाशिकमध्ये एका विवाह सोहळ्यासाठी आलेल्या खासदार राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, माझ्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल व्हावा, ही राज्य सरकारची इच्छा आहे. त्यामुळे हे सरकार घटनाबाह्य पद्धतीने काम करत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.
यापूर्वी सरकारवर टीका झाली आहे. राज्यात देखील यापूर्वी सरकारवर टीका करण्यात आली. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका झाली. त्या वेळी आम्ही कोणाला तुरुंगात टाकले नाही. राज्यात दंगली सुरू झाल्या आहेत. यामागे महाराष्ट्रातील अनैतिक आघाडी आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात कधी दंगली झाल्या नाहीत. सर्वधर्मीय गुण्यागोविदांने राहात होते. कर्नाटकात मात्र शेवटच्या टप्प्यात दंगली झाल्या. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात बजरंग बली नावाने मते मागण्यात आली.
राज्य अस्थिर करून निवडणुकांना सामोरे जाण्याचे षडयंत्र सत्ताधाऱ्यांकडून रचले जात आहे. कर्नाटक, मणिपूरमध्ये भाजपचे राज्य असताना दंगली का पेटल्या? विरोधी पक्षांवर दंगलीचे खापर का फोडता? असा सवाल राऊत यांनी केला.
राज्यात अकोला शेवगाव, त्र्यंबकेश्वर नव्हे, तर संपूर्ण राज्यातही हाच प्रकार सुरू असल्याचा दावा खासदार राऊत यांनी केला.