घोटी (जि. नाशिक) : सरकार कोणतेही येवो शेतकऱ्यांचे प्रश्न शंभर टक्के सोडवू शकत नाही, आपल्यापेक्षा भगवान राम सुखी होते, त्यांना दहा तोंडाच्या एकाच रावणासोबत लढावे लागले, मात्र शेतकऱ्यांना हजारो तोंडाच्या रावणासोबत लढावे लागत आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
थोरात पुढे म्हणाले की, अवकाळी, ओला दुष्काळ, सुका दुष्काळ पडतोच आणि त्यातूनही पिके आली तर बाजारभाव कोसळणार मग शेतकरी जगणार कसा? असा प्रश्न उपस्थित होतो. तुकडा बंदीची चर्चा विरोधकांनी सुरू केली, हा कायदा आजचा नाही जुनाच आहे, मात्र यावर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने बैठका घेतल्या जात असून यावर लवकरच तोडगा सरकार काढेल. यानंतर महानगरपालिका, नगर परिषद शहराच्या बाबतीत विचार केला जाईल. इगतपुरी तालुक्याचे पाणी शहपूरकडे न वळवता त्याचा संपूर्ण फायदा इगतपुरी तालुक्यासह नगर मराठवाड्याला होईल यासाठी तालुक्याचा विश्वास घात होऊ देणार नाही याकरिता आपण प्रयत्नशील आहे.
शेतकरी मेळावा व खरेदीविक्री संघाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी सोमवार ( ता. १ ) रोजी नामदार थोरात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, माजी आरोग्यमंत्री शोभाताई बच्छाव,विधानपरिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे, आमदार हिरामण खोसकर,प्रदेश काँग्रेसचे राजाराम पाटील पानगव्हाणे,माजी आमदार शिवराम झोले,अनिल कदम,काशीनाथ मेंगाळ,पांडुरंग गांगड,मविप्रचे संचालक भाऊसाहेब खातळे यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार मानतांना आमदार हिरामण खोसकर यांनी शेतकरी,कामगार,बेरोजगार युवक, पर्यटन आदी बाबत अडचणी सांगत औद्योगिक क्षेत्रात स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी केली. कार्यक्रमाचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदीविक्री संघाच्या वतीने शेतकरी मेळावा आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजीमाजी संचालक,प्रशासक,खरेदीविक्री संघाचे अध्यक्ष सदस्य उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.