Nashik: वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्यांनाही हलविणार; ZP अंतर्गत कर्मचाऱ्यांच्याही बदल्यांचे मित्तल यांचे निर्देश | stationed for years will be moved Ashima Mittal instructions for transfers of employees also under ZP Nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ZP CEO Ashima Mittal, Nashik News

Nashik: वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्यांनाही हलविणार; ZP अंतर्गत कर्मचाऱ्यांच्याही बदल्यांचे मित्तल यांचे निर्देश

Nashik News : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया सुरू झालेली असताना दुसरीकडे आता वर्षोनुवर्षे एकाच टेबलावर व विभागात ठाण मांडून असलेल्या कर्मचाऱ्यांचीही उचलबांगडी होणार आहे.

मुख्यालयासह पंचायत समित्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकाच टेबलावर जास्तीत जास्त ३ वर्षे व एका विभागात जास्तीत जास्त ५ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात याव्यात असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहे.

त्यामुळे मुख्यालयातील ठाण मांडून असलेल्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. (stationed for years will be moved Ashima Mittal instructions for transfers of employees also under ZP Nashik news)

जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकाच टेबलावर जास्तीत जास्त तीन वर्षे व एका विभागात जास्तीत जास्त पाच वर्षे काम करता येईल असा शासन आदेश आहे. त्यानुसार अंतर्गत बदल्या होणे आवश्यक आहे.

मात्र, अनेक वर्षांपासून ती प्रक्रिया झालेली नाही. दोन वर्षापूर्वी लेखा व वित्त विभागातील बदल्यांबाबत ओरड झाल्याने, लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव यांनी लागलीच कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करत दणका दिला होता.

मात्र, इतर विभागातील अंतर्गत बदल्यांसाठी वेळाकाढूपणा केला जात आहे. तत्कालीन पदाधिकाऱ्यांकडेही अनेकदा तक्रारी केल्या होत्या. प्रामुख्याने बांधकाम, एक, दोन व तीन, जलसंधारण, लेखा विभागात वर्षोनुवर्ष एकाच टेबलावर कर्मचारी ठाण मांडून आहेत. एकाच टेबलावर असल्याने तेथे या कर्मचाऱ्यांची ‘संस्थाने’ तयार झाली आहेत.

यात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी हितसंबंध तयार करून ठेवतात. त्यामुळे बदली करण्याबाबत निर्णय झाल्यास लागलीच आमच्याशिवाय पर्याय नाही अशी स्थिती तयार करून ठेवण्यात हे कर्मचारी पुढे असतात. त्यामुळे या कर्मचा-यांच्या बदल्यांमध्ये सूट मिळत असल्याचे दिसून येते, परंतु या कर्मचाऱ्यांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन श्रीमती मित्तल यांनी अंतर्गत बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे पत्र सर्व विभागांना देण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

एकच टेबल ३ वर्षे, एकच विभाग पाच वर्षे

एकाच टेबलावर तीन वर्षे व एकाच विभागात पाच वर्षांपेक्षा अधिक काळ काम केल्यास संबंधित कर्मचारीची एकप्रकारे मक्तेदारी किंवा हितसंबंध निर्माण होतात. या बाबींमुळे प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण होतो.

या अनुषंगाने शासन निर्णयानुसार सर्व खातेप्रमुख व गट विकास अधिकारींनी अंतर्गत बदलीपात्र अशा सर्व कर्मचाऱ्यांची यादी तयार करून या बदल्या निश्चित कराव्यात. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) यांनी मुख्यालयांतर्गत बदल्यांची कार्यवाही पूर्ण करावी.

गटस्तरावरील अंतर्गत बदल्यांची कार्यवाही ही ३१ मे पर्यंत सर्व गटविकास अधिकारी यांनी पूर्ण करण्याचे निर्देश मित्तल यांनी पत्रात दिले आहे. या पत्रानुसार विभागांमध्ये माहिती तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.