
Nashik Onion Rate News : पिंपळगावमध्ये उन्हाळ कांद्याच्या भावाची उसळी
Nashik News : बांगलादेशने कांद्याची आयात खुली केल्यानंतर पिंपळगावमध्ये क्विंटलभर कांद्याचा सरासरी भाव सोमवारी (ता. ६) एक हजार २१ रुपये निघाला.
आज इथे पुन्हा भावाने उसळी घेतली आणि सरासरी अकराशे रुपये क्विंटल भावाने उन्हाळ कांद्याची विक्री झाली. तसेच मुंबई, पुण्यासह सातारा, कोल्हापूरमध्ये क्विंटलभर कांदा आज हजार रुपये या सरासरी भावाने विकला गेला. (Summer Onion price rebound in Pimpalgaon Price per thousand in Mumbai Satara Kolhapur Pune Nashik News)
कांद्याची आयात बांगलादेशने खुली केली असली, तरीही पाकिस्तानचा कांदा मलेशिया, दुबईसह आखाती देशामध्ये पोचला आहे. भारतीय कांद्यापेक्षा एक ते दोन रुपये किलो इतका कमी भावात पाकिस्तानचा कांदा पोच झाला आहे.
मलेशिया, दुबई आणि आखाती देशात पोचलेल्या कांद्यामध्ये पाकिस्तानच्या कांद्याने पन्नास टक्के हिस्सा मिळवला आहे. शिवाय श्रीलंकेत ३० टक्के पाकिस्तानचा कांदा विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.
पाकिस्तानचा कांदा नवीन असल्याने आयातदारांकडून पसंती मिळत असल्याची माहिती निर्यातदारांपर्यंत पोचली आहे. मात्र प्रत्यक्ष ग्राहकांकडून पाकिस्तानच्या कांद्याला पसंती कशी मिळते यावर भारताचा कांदा आयात करण्यासंबंधीचा विचार आयातदार करतील, असे निर्यातदारांचे म्हणणे आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
इतर बाजारात काहीशी घसरण
कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील इतर बाजारांमध्ये कांद्याच्या भावात सोमवारच्या तुलनेत काहीशी घसरण झाल्याची परिस्थिती आज पाहावयास मिळाली. लासलगावमध्ये सोमवारी १ हजार ५०, तर आज ९०१ रुपये असा क्विंटलला सरासरी भाव मिळाला.
इतर बाजारामधील आजचे क्विंटलचे सरासरी भाव रुपयांमध्ये पुढीलप्रमाणे असून (कंसात सोमवारचे भाव सरासरी क्विंटलला रुपयांमध्ये दर्शवतात) : मुंगसे-७०० (८३०), सिन्नर-६५० (७००), कळवण-८०० (८५१), मनमाड-७०० (७००), सटाणा-७२५ (८१५), देवळा-८०० (९००).
दरम्यान, बांगलादेशची आयात खुली झाली तरीही भावात वाढ होण्याऐवजी २४ तासात भाव कमी कसे झाले? हा प्रश्न तयार झाला आहे.
त्यासंबंधाने व्यापाऱ्यांशी संवाद साधल्यावर कांद्याच्या गुणवत्तेच्या प्रश्नाकडे अंगुली निर्देश करण्यात आला आहे.
पण त्याचवेळी बांगलादेशमधील कांद्याची निर्यात वाढताच, स्थानिक बाजारातील भावावर त्याचे सकारात्मक परिणाम दिसू शकतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.