इगतपुरी : इगतपुरी तालुक्यात सलग दोन दिवस गारांसह पडलेल्या अवकाळी पावसाने शेतीमालासह विविध पिकांचे नुकसान तर केलेच, मात्र अंतिम मळणीनंतर शेतात रचलेला पेंढा गारांच्या पावसामुळे भिजला आहे.
इगतपुरी तालुक्यात ऐन सणासुदीच्या काळात सर्वत्र मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे पेंढा भिजल्याने व सलग तीन चार दिवसांपासून उनसावलीचा खेळ सुरु असल्यामुळे बुरशी आलेला हा पेंढा मुक्या व पाळीव जनवारांच्या खाण्यायोग्य राहिला नाही.
त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आगामी चाक महिने कोरडा चारा कुठून उपलब्ध करावा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
मागील तीन चार दिवसात तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. काही शेतकऱ्यांनी कशीबशी धडपड व धावपळ करीत वैरण सुरक्षित ठिकाणी ठेवले असले तरी चाऱ्यासाठीचा पेंढा व पेंढ्याच्या गंजी मात्र शेतातच ठेवल्या होत्या.
गारा व जोरदार पावसाने शेतात आणि मांडवावर ठेवलेला सर्व पेंढा भिजला. भिजलेला हा पेंढा आता कूजू लागला असून त्यावर काळी बुरशी येऊ लागली आहे. त्यामुळे हा कुजलेला पेंढा जनावरांसाठी खाण्यालायक राहिलेला नाही.
रानातील हिरवे गवत देखील आता सुकले आहे. अशा परिस्थितीमध्ये दुभत्या जनावरांचा आणि भाकळ जनावरांना खायला काहीच राहिले नसल्याने काही दिवसांतच जनावरांवर उपासमारीची वेळ येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
आधीच आर्थिक संकटात असल्यामुळे पेंढा विकत आणणे देखील शक्य नाही. सर्वत्रच पाऊस झाल्याने पेंढा उपलब्ध होणे आवश्यक आहे. पेंढ्याच्या किंमती देखील वाढू शकतात, त्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला आहे.
''जनावरांसाठी ठेवलेला पेंढा अवकाळी पावसाने भिजून खराब झाला. आता चाऱ्याची सोय कशी करायची हाच प्रश्न डोळ्यासमोर आहे. गुरे जगली तरच उदरनिर्वाह चालणार आहे. शासनाने याबाबत योग्य ती कार्यवाही नुकसान भरपाई द्यावी.'' - शांताराम शेलार, शेतकरी, त्रिंगलवाडी.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.