
Nashik News : कुसुमाग्रज स्मारकात रंगले महिलांचे कवी संमेलन!
नाशिक : बाई (Women) राजकीय कविता लिहूच शकत नाही, अशा स्त्रियांच्याच मानसिकतेमुळे अंत:मुखता येते. (women poets meeting was held at Kusumagraj memorial nashik news)
समाजातील या बौद्धिक दिवाळखोरीत मूलभूत बदलाची गरज असल्याचे सांगत ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांनी कवयित्रींना विशिष्ट चौकटीत अडकवू पाहणाऱ्यांचा आपल्या शैलित समाचार घेतला.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी (ता. २८) झालेल्या महिला काव्य संमेलनात अध्यक्षिय मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या. प्रसिद्ध कवयित्री नीरजा, प्रज्ञा दया पवार, डॉ. संगीता बर्वे, अंजली कुलकर्णी यांनी संमेलनात सहभाग घेतला.
हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
श्रीमती पाटील यांनी, महिलांसमोरील विविध प्रश्नांवर भाष्य करत मराठी राजभाषा झाली; पण व्यवहारात होत असलेल्या तिच्या अवहेलनेबद्दलही खंत व्यक्त केली. पवार यांनी, ‘भारीच नाद लागला मला शब्द कुटण्याचा’ अशा शब्दांतून परंपरांवर मार्मिक शब्दांत प्रहार केले.
कुलकर्णी यांनी ‘लपवाछपवी’ कविता सादर करीत उपस्थितांची दाद घेतली. नीरजा यांनी ‘खैरलांजी ते कोपर्डी’ या कवितेत ‘काय असते जात बाईची, काय असतो धर्म, बदलतो का वेदनेचा स्तर जात बदलण्याने’ असा सवाल उपस्थित केला. अंजली कुलकर्णी यांनी मैफलीचे संचालन केले.