कुठे गेले बारा कोटी रोजगार? युवक काँग्रेसच्या मोर्चानंतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

rojgar congress.jpg
rojgar congress.jpg

नाशिक : ‘रोजगार द्या, रोजगार द्या, मोदी सरकार रोजगार द्या’, ‘मोदी सरकार हाय हाय’, ‘कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’... युवक काँग्रेसच्या अशा घोषणांनी नाशिकचा महात्मा गांधी रस्ता गुरुवारी (ता. १०) दणाणून गेला होता. 

काँग्रेस पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा
 जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेसच्या शहराध्यक्षांसह दोन नगरसेविका तसेच अन्य पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. युवक काँग्रेसतर्फे केंद्र सरकारविरुद्ध ‘रोजगार दो’ मोर्चा काढण्यात आला. कोरोनामुळे जमावबंदीचे आदेश असल्याने तेथे उपस्थित कॉँग्रेस शहराध्यक्ष शरद आहेर, महिला अध्यक्षा तथा नगरसेविका वत्सला खैरे, डॉ. हेमलता पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील पाटील, जिल्हाध्यक्ष ग्रामीण दिनेश चोथवे यांच्यासह २५ ते ३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला.  

दोन हजारही रोजगार उपलब्ध नाहीच

सहा वर्षांपूर्वी सत्तेवर येताना दर वर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्‍वासन केंद्रातील मोदी सरकारने दिले होते. परंतु दोन कोटी सोडाच दोन हजारही रोजगार उपलब्ध होऊ शकलेले नाहीत, याकडे लक्ष वेधत शहर युवक काँग्रेसने रस्त्यावर उतरत केंद्र सरकारचा जोरदार निषेध केला. दुपारी बाराला काँग्रेस कमिटीपासून निघालेल्या या मोर्चात बेरोजगार युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविले. 

साडेतेरा कोटी रोजगार गेले 
केंद्र सरकारने सत्तेत येताना दर वर्षी दोन कोटी रोजगारनिर्मितीचे आश्‍वासन दिले होते. नव्याने रोजगारनिर्मिती सोडाच देशातील तब्बल साडेतेरा कोटी लोकांचे आहे ते रोजगारही गेल्याचा आरोप युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी केला. लॉकडाउन व अन्य कारणांनी कोलमडून पडलेल्या उद्योगांना नव्याने चालना देण्यासाठी त्यांना कर्ज नव्हे, तर आर्थिक पॅकेज द्यावे, युवकांना दरमहा सहा हजार रुपये भत्ता द्यावा, केंद्र सरकारच्या अखत्यारीतील दहा लाख रिक्त पदे त्वरित भरावीत, सार्वजनिक उपक्रमांचे खासगीकरण थांबवा, अशी मागणी नगरसेवक राहुल दिवे यांनी केली.

खोसकरांऐवजी गावितांचे छायाचित्र
काँग्रेसकडून गुरुवारी मोदी सरकारविरोधात ‘रोजगार दो’ आंदोलन करण्यात आले. मात्र या वेळी आंदोलनापेक्षा बॅनरबाजीचीच चर्चा जास्त रंगली. आंदोलनासाठी बॅनर तयार करण्यात आले. त्यात इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्याऐवजी काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला गावित यांचे छायाचित्र टाकण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने निर्मला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढविली होती. त्यामुळे काँग्रेसचा त्यांचा सध्या संबंध नसल्याने त्याचे बॅनरवरील छायाचित्र लक्ष वेधून घेत होते. यासंदर्भात शहर-जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी ग्राफिक डिझायनरची चूक असल्याचे सांगितले.  

या वेळी शहराध्यक्ष शरद आहेर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिनेश चोथवे, कार्याध्यक्ष राहुल पाटील, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष स्वप्नील पाटील, महिला शहराध्यक्षा नगरसेविका वत्सला खैरे, बबलू खैरे, नगरसेवक राहुल दिवे, नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, अण्णा मोरे आदी सहभागी झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com