नाशिक : तलाठी कार्यालयात आता खासगी व्यक्तीला कार्यालयीन कामकाजासाठी ठेवता येणार नाही. तसे आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. तलाठ्यांनी कार्यालयाच्या आवारात दाखल्यांसाठी लागणाऱ्या शुल्काचा दरफलक लावणे बंधनकारक असल्याचे त्या स्पष्ट केले आहे.
कार्यालयात तलाठी भेटत नसल्याच्या तक्रारींच्या जोडीला सरकारकडे नागरिकांकडून अनेक सूचनाही प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने सरकारने तलाठ्यांना सूचना देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे. त्यानुसार तलाठ्यांना आता जनतेच्या माहितीसाठी त्यांचा नियोजित दौरा, बैठकांची माहिती कार्यालयाच्या आवारात लावावी लागणार आहे.
तलाठ्यांची कर्तव्ये तथा जबाबदाऱ्यांच्या माहितीचा फलकही लावावा लागणार आहे. तलाठी, मंडल अधिकारी, नायब तहसीलदारांचे नाव आणि त्यांचा मोबाइल क्रमांक लावणे बंधनकारक केले आहे. तलाठी, मंडल अधिकारी यांना सरकारने निवासस्थाने उपलब्ध करून दिली आहेत. त्यांनी या निवासस्थानांत राहणे अपेक्षित आहे. सेवा हमी कायद्यांतर्गतच्या सेवांविषयक बाबींची (विविध प्रकारचे उतारे आणि त्यासाठी लागणारा कालावधी) माहिती कार्यालय आवारात लावायची आहे. शेतजमिनी, पीकपाहणी करताना संबंधित शेतजमिनीच्या भेटीचा तपशील तलाठ्यांना जाहीर करावा लागणार आहे.
|