नाशिक - गणेशोत्सव ते दसरा दिवाळीदरम्यानच्या सण-उत्सवांसाठी आतापर्यंत गोरगरिबांना नियमित साखरेशिवाय अर्धा किलो अतिरिक्त साखर मिळायची. पण ही साखर आता बंद झाली आहे. त्याऐवजी उद्यापासून (ता. 12) नाशिककरांना रेशन कार्डावर मीठ मिळणार आहे.
गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी आतापर्यंत कित्येक वर्षे रेशन कार्डावर अतिरिक्त साखर दिली जात होती. मात्र रेशनवरील धान्यवाटपाचे निकष काही वर्षांत पूर्णपणे बदलले आहेत. अंत्योदय आणि प्राधानक्रमाच्या वर्गवारीतील शिधापत्रिकाधारकांनाच सरकारी धान्य दिले जाते. त्यात पुन्हा धान्याचा कोटा घटविला गेला आहे. तेल कधीच गायब झाले आहे, पाठोपाठ रॉकेलही मिळणे बंद होत आले आहे. गहू, तांदूळ आणि एक किलो साखर मिळते. त्यात दिवाळीच्या सण-उत्सवात वाढ करून अतिरिक्त 500 ग्रॅम साखर दिली जायची.
प्रतिमाणशी 160 ग्रॅमने जास्त साखर दिली जाते. जिल्ह्यातील सुमारे एक लाख 80 हजार अंत्योदय लाभार्थींना या निर्णयाचा लाभ दिला जातो.
सध्या या लाभार्थींना प्रति माणशी एक किलो याप्रमाणे 1800 क्विंटल साखरेचा कोटा मिळतो. अतिरिक्त 500 ग्रॅम साखर देण्याची पद्धतही बंद झाली आहे. यंदा चिमूटभरही अतिरिक्त साखर मिळणार नाही अशी स्थिती आहे. त्याऐवजी लोह आणि आयोडीनयुक्त मीठ मिळणार आहे. राज्याचे पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते उद्या गंगापूर रोड येथील केंद्रावरून मिठाचे वितरण होणार आहे.
|