नाशिक - येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे रविवारी (ता. 24) आमदार बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत कांदा परिषद होत आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती, सिन्नर फाटा येथे दुपारी ही परिषद होईल. या वेळी बच्चू कडू हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील.
कांद्याचे अनुदान 200 रुपयांवरून 500 रुपये करावे, कांद्याचा उत्पादन खर्च काढून भाव कायम करावा, जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून कांदा वगळवा आणि प्रस्ताव केंद्राकडे पाठवून हमीभाव कायम करावा, उन्हाळा कांद्याचा पंचनामा करावा, शेतकऱ्यांना अनुदान रक्कम ठरवून मदत करावी, यांसह विविध मागण्यांसंदर्भात ही कांदा परिषद होत आहे. या कांदा परिषदेसाठी नाशिकसह, कांद्या उत्पादन करणाऱ्या सोलापूर, पुणे, नगर, जळगाव, औरंगाबाद, धुळे या जिल्ह्यांतील शेतकरी सहभागी होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या वेळी पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दत्तू बोडके, जिल्हाप्रमुख अनिल भडांगे, जगन काकडे, नितीन गवळी, संध्या जाधव आदी उपस्थित होते.
|