नाशिक - रतन टाटा, मुकेश अंबानींना मी नाशिकची ओळख करून दिली. त्यामुळे रिलायन्स, जीव्हीके, एल अँड टीसारख्या नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय उद्योगांनी नाशिकच्या विकासासाठी योगदान दिले. मुंबईत अशी शेकडो कार्पोरेट कार्यालये आहेत; मात्र त्यांनी एक काम तरी केले का? ते मी नाशिकला करून दाखवले; मात्र नाशिककरांनी माझी योग्य दखल घेतली नाही, अशी खंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
नाशिकमध्ये केलेल्या कामांचे मूल्यमापन करून त्याचा विचार करावा. नाशिककरांनी दखल न घेतल्यास हे दुर्दैवचं म्हणावे लागेल, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
विकासकामांच्या उद्घाटनांच्या निमित्ताने राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले असता, शासकीय विश्रामगृहावर आज प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. गेल्या दोन वर्षांत मनसेचे पंचवीस नगरसेवक भाजप, शिवसेनेमध्ये गेले. त्यावर त्यांनी हात झटकून विषय टाळला; परंतु जे गेले त्यांना भविष्यात पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नसल्याचे सांगताना पक्षांतर केलेल्या नगरसेवकांना गर्भित इशारा दिला. शिवस्मारकावरूनही राज यांनी राज्य सरकारवर टीका केली.
सरकारकडून खोडा
विकासकामांबाबत सरकार खोडा घालण्याचे काम करतं आहे. महापालिकेत कर्मचारी भरती असो, की मुकणे धरणातून थेट पाइपलाइन टाकण्याचे काम असो. सरकारकडून खोडा घालण्याचेच काम होत आहे. पालकमंत्र्यांना विचारल्याशिवाय कामे होत नाहीत, तसा दंडकचं घालून दिल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
|