manmad
manmad

राज्यात पहिल्यांदाच पिण्याच्या पाण्यासाठी जनहित याचिका दाखल

मनमाड : मनमाड शहरात भीषण पाणी संकट निर्माण झाले असून शहराची पाणीटंचाई दूर करण्यासाठी सध्या एकही शाश्वत पाणी योजना नाही. पालखेड धरणाचे आवर्तनही पुरेसे मिळत नाही. त्यामुळे शाश्वत पर्याय म्हणून पुढे आलेली करंजवन योजना हीच एकमेव तारणारी आणि पाणीटंचाईतुन मुक्त करणारी योजना असल्याने शासनाने याचा गांभीर्याने विचार करून योजनेस गती देण्याची गरज आहे 

राज्यात पहिल्यांदाच पिण्याच्या पाण्यासाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल झालेले मनमाड हे एकमेव शहर आहे. पाण्याचा शाश्वत स्रोत नसल्याने ४० वर्षांपासून येथे पाणीटंचाई आहे. विविध पाणी योजना राबविल्या गेल्या मात्र शाश्वत पाणी मिळाले नाही. त्यामुळे शहराचा विकास खुंटला, बेरोजगारी वाढली अनेकांनी इतर शहरांत स्थलांतर केले शिक्षण, रोजगार, दवाखाना यांचीही कमतरता आहे.

सध्या पालखेड धरणाचे अवर्तन मिळते पण तेही पुरत नाही २० ते २५ दिवसांनी महिन्यातून एकदा पाणीपुरवठा होतो मात्र धरण कोरडेठाक पडल्याने पाणी संकट निर्माण झाले आहे, टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. दहा दिवसांनी धरणात पाणी पडणार असले तरी हे दहा दिवस मोठे मुश्किलीचे जाणार आहे पाण्यासाठी दहा दिशा भटकंती करण्याची वेळ आली असली तरी अद्यापही मनमाड शहराचा पाणी प्रश्न सुटलेला नाही हा प्रश्न सुटावा यासाठी विविध पर्याय पुढे आले मात्र एकही शाश्वत पर्याय दिसत नाही. त्यामुळे करंजवन हा शाश्वत पाण्याचा पर्याय पुढे आला आणि हाच पर्याय पाणीप्रश्न सोडविणारा दिसत आहे करंजवन ते मनमाड ८० किमीची थेट पाईपलाईन घेण्याच्या दृष्टीने सुरू असलेले सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

करंजवनमधून १३५ लिटर प्रतिमानसी पाणी मिळावे अशी मागणी पालिकेने केली आहे. तर पालखेडचे आरक्षण कायम ठेवून योजना देण्याची मागणी होत आहे यावेळी २९७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ही योजना शासन दरबारी पोहचली असून पालिकेने संचालक नगर परिषद प्रशासन मुंबई यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे, सदर विभागातून काही त्रुटी काढण्यात आल्या असल्या तरी या त्रुटींची पूर्तता पालिकेतर्फे करण्यात आली आहे. सदर विभागातून हा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनदरबारी सादर करण्यात येणार आहे सर्वे पूर्ण झाला आहे. २९७ कोटी रुपयांचे ढोबळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे सदर योजनेला लवकरात लवकर मंजुरी मिळाल्यास जलदगतीने कामाला सुरुवात होईल.

पाणी टंचाईचे शहर असलेल्या मनमाडसाठी करंजवन योजना हीच जीवनदायी योजना असून सदर योजना मंजूर झाल्यास करंजवन धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणी वाघदर्डी धरणात पडू शकते. त्यामुळे जितके आरक्षण असणार तितकेच पाणी उपलब्ध होऊ शकते कमी पाणी मिळण्याचे अथवा पाणी चोरी, बाष्पीभवन आदी समस्या जाणवणार नाही. पूर्णक्षमतेने विशेषतः ग्राव्हीटीने (उताराने) पाणी मिळेल, पंपिंगचा अवाच्या सव्वा येणारा खर्च येणार नाही. त्यामुळे मनमाडकरांच्या माथी असलेला पाणीटंचाईचा डाग धुतला जाऊ शकतो ,शहराला रोज मुबलक आणि शुद्ध पाणीपुरवठा होऊ शकतो सध्या निर्माण झालेली पाणी टंचाई पाहता पालकमंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष देण्याची गरज आहे. महाजनांनी यापूर्वी योजनेत रुची दाखवल्याने मनमाडकरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, त्यामुळे शासनाने मनमाड शहराचा विचार करून शासनदरबारी सादर झालेली करंजवन पाणी योजना कोणत्याही लालफितीत न अडकवता मंजूर करून शहराला पाणीटंचाईतुन मुक्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

करंजवन योजना पूर्ण झाल्यास -  ४० वर्षाचा पाणीप्रश्न मिटेल, पाणीटंचाईचे शहर ही ओळख पुसेल, शहराचा विकास होईल, औद्योगिकरण वाढेल, बेरोजगारी दूर होईल, नागरिकांना रोज मुबलक पाणी मिळेल,  पंपिंगवर होणारा कोटींचा खर्च वाचेल 

सध्याची परिस्थिती अशी की - सध्या एकही शाश्वत पाणी योजना नाही, वर्षभर पाणीटंचाई असते, २० ते २५ दिवसांनी पाणीपुरवठा म्हणजे महिन्यातून एकदाच पाणी येते,पाण्यासाठी महिलांसह पुरुष, तरुण, तरुणी, वृद्ध, आबालवृद्ध यांना  वणवण भटकण्याची वेळ, पाटोदा पंपिंग स्टेशनचे वीजबिल वर्षाला कोटीच्या वर, वागदर्डी धरणावर २४ च्यावर बंधारे, धरण परिसरात ३५ च्यावर अनधिकृत विहिरी, शहराचा विकास पूर्णपणे खुंटला, बेरोजगारीत वाढ, बेरोजगार तरुण, नागरिकांची नाशिक, मुंबई, औरंगाबाद, पुणे आदी शहरांना कामासाठी पसंती, औद्योगिक वसाहत नाही, चांगले दवाखाने, शाळा, कॉलेज नाही, मोठी शासकीय कार्यालये नाही जी होती ती इतरत्र हलविण्यात आली,  

करंजवन योजनेसाठी पालकमंत्री गिरीश महाजन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली आहे नवनिर्वाचित खासदार भारती पवार यांचीही भेट घेतली असून  सर्वस्तरावर प्रयत्न सुरू आहे  प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला आहे 

- गणेश धात्रक, माजी नगराध्यक्ष तथा गटनेते  

मनमाडच्या पाणीप्रश्न संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे करंजवन योजना ही मनमाडला तारणारी योजना आहे सध्या एकही शाश्वत पाणी योजना नाही त्यामुळे शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा यामुळे मनमाडचा ४० वर्षाचा पाणीप्रश्न मिटेल

- अशोक परदेशी, जनहित याचिकाकर्ते 

मनमाडची पाणीटंचाई दूर करण्यासाठी अनेक पर्याय पुढे आले मात्र एकही शाश्वत आढळून न आल्याने करंजवन हीच शाश्वत, योग्य व पाणीटंचाई दूर करणारी योजना आहे संचालक नगर परिषद प्रशासन मुंबई यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे निघालेल्या त्रुटींची पूर्तता केली आहे

- डॉ दिलीप मेनकर, मुख्याधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com