'उज्ज्वला'च्या लाभार्थ्यांची स्वप्ने 'चुलीत'

 'उज्ज्वला'च्या लाभार्थ्यांची स्वप्ने 'चुलीत'

साक्री - स्वयंपाक करताना चुलीच्या धुरापासून मुक्ती मिळावी, सर्वसामान्यांच्या घरात गॅस पोहोचावा, "स्वच्छ इंधन- बेहतर जीवन' असे म्हणत केंद्र सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेला घरघर लागली आहे. काही तांत्रिक अडचणी उद्‌भवल्याने तालुक्‍यातील अनेक गरजू लाभार्थ्यांकडून गॅस कनेक्‍शन परत घेतले जात असून, ज्या एजन्सीने ते वितरित केले होते तेच एजन्सीचालक गावोगावी जाऊन गॅस सिलिंडर, शेगडी व कागदपत्रे जमा करून घेत आहेत. एक जूननंतर कनेक्‍शन, सिलिंडर परत केले जाईल, एवढेच मोघम उत्तर लाभार्थ्यांना दिले जात आहे. 

सर्वसामान्य लाभार्थ्यांना अवघ्या 100 रुपयांत केंद्राच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून गॅसचे वाटप करण्यात आले. तालुक्‍यातही सर्वच गावांमध्ये लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. या योजनेच्या लाभासाठी घरात पूर्वी गॅस कनेक्‍शन नको, अशी अट होती. मात्र, आता याच अटीची तांत्रिक अडचण उद्‌भवली असल्याने तालुक्‍यातील सुमारे 60 ते 70 गावांतील लाभार्थ्यांकडून गॅस कनेक्‍शन, सिलिंडर, शेगडी व कागदपत्रे परत घेतली जात आहेत. 

काय आहे तांत्रिक अडचण? 
प्रामुख्याने या योजनेचा लाभ देताना विविध अटी-शर्ती होत्या. कागदपत्रांची पडताळणी केली जात होती. असे असतानाही यात पुन्हा तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. शिधापत्रिकेवर ज्यांच्या नावे यापूर्वी गॅस कनेक्‍शन असल्याची नोंद आहे अशा काही लाभार्थ्यांनाही पुन्हा या योजनेतून कनेक्‍शन देण्यात आले. यामुळे या ग्राहकांची शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी संगणक प्रणालीत नोंद करताना वितरक एजन्सीना तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने हे कनेक्‍शन परत घेतले जात आहेत. शक्‍य झाल्यास या अडचणी दूर झाल्या, तर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा जूनमध्ये हे कनेक्‍शन लाभार्थ्यांना दिले जातील, असे एका एजन्सी संचालकाने "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

आकडे फुगवण्यासाठी दुर्लक्ष? 
दरम्यान, उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे गॅस कनेक्‍शन नसावे, ही मुख्य अट होती. असे असताना कनेक्‍शन देण्यापूर्वी याची वितरक एजन्सीने पडताळणी केली नव्हती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आधी कनेक्‍शन दिले अन्‌ आता तांत्रिक अडचण उद्‌भवल्याने ते परत घेण्याचा प्रकार सर्वसामान्य लाभार्थ्यांच्या आकलनाच्या पलीकडचा असून, केवळ प्रसिद्धीसाठी व कनेक्‍शन वाटपाचे आकडे फुगवण्यासाठी तर हा सारा प्रकार झाला नाही ना, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. 

प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतून गेल्या जानेवारीत गॅस कनेक्‍शन मिळाले होते. मात्र, तपासणीसाठी परत घेऊन चाललो असे सांगत एजन्सीचे प्रतिनिधी सर्व साहित्य परत घेऊन गेले. तसेच तेव्हा घेतलेले पाचशे रुपयेही संबंधितांनी परत केले. आता गॅसच नसल्याने पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आमच्यावर आली आहे. 
- दामू गोयकर, विजापूर, ता. साक्री 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com