
Water Connection News : महापालिका यंत्रणेचे ‘दुर्लक्ष’ की ‘आशीर्वाद’!
Dhule News : शहरात एकीकडे बहुतांश लोकसंख्येला चार ते आठ दिवसांआड पाणीपुरवठा होतो. उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याची गरज लक्षात घेता पाण्याचे हे नियोजन नागरिकांसाठी मोठी कसरत करणारी ठरते.
दुसरीकडे मात्र शहराच्या विविध भागांतून जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरून बेकायदा नळ कनेक्शन्स घेऊन अनेक जण २४ तास पाणी उपसा करतात.
हा प्रकार धुळ्यात नवीन नाही. शनिवारी (ता. २०) असाच प्रयत्न करणाऱ्या एका नागरिकाविरुद्ध महापालिकेकडून गुन्हा दाखल झाला. अशीच कठोर भूमिका घेऊन अशा नळधारकांवरही कठोर कारवाई करण्याची गरज आहे. (Problem of pipe connection on main water channels Need for drastic action by conducting campaign Dhule News )
शहरातील बहुतांश भागात चार-चार, आठ-आठ दिवसांआड पाणीपुरवठा होतो. त्यामुळे एवढे दिवस पाणी पुरविण्यासाठी घराघरांत पाणी साठवून ठेवण्याशिवाय पर्याय नसतो. नोकरदार, श्रीमंतांकडे बोअरवेल्स, विहिरी आहेत, वॉटर फिल्टर आहेत.
त्यामुळे अशा नागरिकांना महापालिकेकडून पाणीपुरवठा झाला काय आणि नाही झाला काय किंवा कितीही विलंबाने झाला तरी त्यांना त्याचा फारसा फरक पडत नाही. अशी मंडळी उलट महापालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठा होणारे पाणी नळी लावून अंगणात शिंपडत बसतात अथवा आपले बंगले स्वच्छ करण्यासाठी या पाण्याचा वापर करताना पाहायला मिळतात.
दुसरीकडे मात्र ज्यांच्याकडे महापालिकेच्या पाण्याशिवाय पर्यायच नाही अशा बहुतांश नागरिकांना पाण्यासाठी मोठी प्रतीक्षा करण्याशिवाय गत्यंतर नसते. दरम्यान, पाणी वितरणातील अडचणींमुळे सामान्य नागरिकांनाच याचा फटका सहन करावा लागतो.
ज्या दिवशी पाणीपुरवठा होतो, त्या दिवशीही अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. परिणामी शेवटच्या घरापर्यंत पाणी पोचविण्यासाठी महापालिकेलाही चार-चार, पाच-पाच तास पाणी सुरू ठेवावे लागतो.
एकीकडे पाण्यासाठी अशी कसरत असताना दुसरीकडे अनेक ठिकाणी अनेक जणांनी मुख्य जलवाहिन्यांवरून नळ कनेक्शन्स घेतल्याचेही पाहायला मिळते. तत्कालीन आयुक्त नामदेव भोसले यांनी अशा नळधारकांवर कारवाईचा बडगा उगारला होता. त्या वेळी अशी अनेक नळ कनेक्शन तोडण्यात आली होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अक्षरशः लूट
मुख्य जलवाहिन्यांवरून नळ कनेक्शन्स घेऊन संबंधित नागरिक २४ तास पाणी वापरतात. महापालिकेकडून पाण्याच्या शुद्धीकरणावर लाखो रुपये खर्च होतात. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी वापरले गेले पाहिजे.
मात्र, असे नळधारक हेच शुद्ध पाणी पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी वापरतात. घरात २४ तास पाणी सुरू असल्यावर त्याचा वारेमाप वापर केला जातो. त्यामुळे अशा नागरिकांना पाण्याची समस्याही कधी भेडसावत नाही.
शहरात ज्या-ज्या भागातून मुख्य जलवाहिनी जाते अशा सर्व भागांत हे प्रकार असल्याचे सांगितले जाते. नकाणे रोड भागात याचे प्रमाण अधिक आहे. शहराच्या पेठ भागातदेखील बड्या हस्तींकडे असे मुख्य जलवाहिन्यांवर नळ कनेक्शन्स असल्याचे तर काही जण महापालिकेच्या याच पाण्यावर फिल्टर पाण्याचा व्यवसाय करत असल्याचेही सांगितले जाते.
तत्कालीन आयुक्त भोसले यांच्या कार्यकाळातच हे प्रकार समोर आले होते. नंतर मात्र त्यावर ठोस कारवाई न झाल्याने हा प्रश्न थंड बस्त्यात गेला.
कुणाचा आशीर्वाद?
मुख्य जलवाहिन्यांवरून नळ कनेक्शन घेण्याची हिंमत यंत्रणेच्या पाठबळाशिवाय, सहकार्याशिवाय शक्य नाही. त्यामुळे अशा लोकांचाही शोध घेण्याची गरज आहे. महापौर प्रतिभा चौधरी यांनी नुकतेच याबाबत पाचपट पाणीपट्टी वसुलीचे आदेश दिले आहेत.
मात्र, केवळ याद्वारे हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी गुन्हेच दाखल करण्याची गरज आहे. शिवाय असे नळकनेक्शन्स शोधून काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचीही गरज आहे.