जळगाव - गेल्या चार वर्षांपासून कमी- अधिक प्रमाणात सातत्याने पडणारा दुष्काळ, जलसंधारण अथवा पुनर्भरण योजनांचा अभाव, तुलनेने दिवसागणिक वाढत जाणारा पाण्याचा अतिउपसा यांमुळे जळगाव जिल्ह्यातील १५ पैकी ७ तालुक्यांचा पाण्याचा ‘अतिउपसा’ करणाऱ्या संवर्गात समावेश झाला आहे. कडक उन्हाळा व अतिपाण्याच्या उपशामुळे जिल्ह्यातील रावेरमधील विहिरींची पातळी २०.६६, तर यावलमध्ये २६.३७ मीटरने खोल गेल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करण्यात आला आहे.
जमिनीतून पाण्याचा प्रचंड उपसा होऊन भूजल पातळी खोल गेलेल्या क्षेत्रासाठी आता ‘डार्क झोन’ या संज्ञेऐवजी अतिउपसा, क्रिटिकल, सेमीक्रिटीकल अशी वर्गवारी करण्यात आली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील तीन तालुके ‘क्रिटिकल’, पाच तालुके ‘सेमी क्रिटिकल’ प्रकारात आहेत. अतिउपसा झालेल्या सात तालुक्यांमधील भूजल पातळी जवळपास दहा मीटरपेक्षा अधिक खोल आहे.
भूजल सर्वेक्षण विभागाकडून टंचाईच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ऑक्टोबर, जानेवारी, मार्च व मे अशा चार महिन्यांत भूजल पातळीचे सर्वेक्षण केले जाते.
जळगाव जिल्ह्यात जानेवारी महिन्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार यावल
तालुक्यातील भूजल
पातळी सर्वाधिक खोल (२४.८८ मीटर) आढळून आली. त्याखालोखाल जळगाव तालुक्याची भूजल पातळी १९.०७ मीटर, रावेर तालुक्याची १७.९९ मीटर, चोपड्याची १४.२९, मुक्ताईनगरची १३.६२, बोदवडची ११.५८, अमळनेरची १०.२५, भुसावळची १०.९३ मीटर अशा नोंदी घेण्यात आल्या आहेत. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या रावेर, चोपडा व यावल तालुक्यातील भूजल पातळी गेल्या दहा वर्षांत चार ते सात मीटर एवढी खोल गेल्याचे निरीक्षण आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.