नदीजोडनंतर बघाच!; शेतीत क्रांती अन् नाशिककरांना 24 तास पाणी

River-Connected
River-Connected

नाशिक - दुष्काळ निर्मूलनासाठी नदीजोड हा उत्तम पर्याय आहे. समुद्राला मिळणारे पाणी महाराष्ट्रातील धरणांत वळवून नाशिकसह मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या महत्त्वाच्या नदीजोड प्रकल्पावर नवी दिल्लीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र-गुजरात राज्यांतील सुमारे १८ हजार कोटींच्या प्रकल्पावर बैठक होऊन तो लवकरच मार्गी लागेल. त्यानंतर शेतीत क्रांती व नागरिकांना २४ तास पाणी मिळेल, असा दिलासा देत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सध्याच्या दुष्काळाबाबत चिंता मांडणाऱ्या लोकप्रतिनिधींची समजूत काढली.

जिल्हा नियोजन समितीची बुधवारी (ता. ९) नाशिक रोडला विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली. त्यात लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील दुष्काळाबाबत आक्रोश मांडला. आमदार जिवा पांडू गावित यांनी महाराष्ट्रातील पाणी गुजरातला जाऊ नये यासाठी जल प्राधिकरणाचे ३०० मीटरच्या आत प्रकल्पाचे नियम पाळून लिफ्ट योजना, वळण बंधारे आणि बोगद्याद्वारे गुजरातला जाणारे पाणी राज्यासाठी वापरण्यासाठी मागणी केली. तत्पूर्वी, विविध आमदारांनी दुष्काळावर तीव्र भावना मांडल्या.

बैठकीला ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार अनिल कदम, राजाभाऊ वाजे, पंकज भुजबळ, विभागीय आयुक्त राजाराम माने, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, नियोजन अधिकारी योगेश चौधरी आदी उपस्थित होते.   तत्पूर्वी, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी दुष्काळाबाबत तक्रारींचा पाऊस पाडला. आमदार पंकज भुजबळ यांनी पालकमंत्र्यांनी प्रत्येक तालुक्‍यातील दुष्काळाचा आढावा घ्यावा. मंडलातील एखाद्या गावाच्या पावसावरून इतर अनेक गावांवर अन्याय सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्‍यातील दुष्काळी गावाची माहिती घ्यावी. येवला, लासलगाव, नांदगाव व मनमाड भागातील तीव्रतेची माहिती त्यांनी दिली. नरहरी झिरवाळ यांनी भूसंपादनाशिवाय ८२-८३ च्या बंधाऱ्यांचा रखडलेला विषय मार्गी लावावा, तर नरेंद्र दराडे, किशोर दराडे यांनी येवला भागातील पाणीप्रश्‍नाच्या तीव्रतेची माहिती दिली. जिल्हा परिषद सदस्या सीमांतिनी कोकाटे यांनी सिन्नर पाणीयोजना एक्‍स्प्रेस फीडरसाठी ३५ लाखांचा प्रस्तावाची माहिती दिली. जे. पी. गावित यांनी कळवण, पेठ, सुरगाणा येथील पाणीटंचाईसह गुजरातला जाणारे पाणी राज्यासाठी वापरण्याची मागणी केली. कळवणच्या पूर्व भागातील विहिरी आटल्याने आवर्तनाची मागणी केली.

श्री. महाजन म्हणाले, की समुद्राला वाहून जाणारे पाणी अडविले तरच राज्याला मदत होईल. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प रेंगाळले. मात्र, आपण सत्तेत आल्यानंतर पुन्हा नदीजोड प्रकल्पाच्या फायली काढल्या. पुढील आठवड्यात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत महाराष्ट्र-गुजरातमधील प्रकल्पाबाबत बैठक होईल. १८ टीएमसी पाणी गिरणा नदीत सोडण्यासह नाशिक आणि तेथून मराठवाड्याला पाणी देण्याचे नियोजन आहे. तुम्हीला पाहत राहाल असा हा प्रकल्प आहे. नवी दिल्लीत सादरीकरण व्हायचे असल्याने त्याबाबत आताच सगळे सांगता येणार नाही. पण नदीजोडचा लवकरच डीपीआर तयार होईल. पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मार्ग काढता येईल.

पालकमंत्र्याच्या सूचना
 पाण्याचे काटकसरीने नियोजन करा
 शाळादुरुस्ती प्रकल्पावर भर द्यावा
 प्रशासकीय कामे गतीने मार्गी लावा 
 छावण्यांसोबत घरपोच चारा देण्याचा विचार  
 आचारसंहितेपूर्वी १०० टक्के निधी खर्च करा

लोकप्रतिनिधींच्या सूचना
 नियोजन समितीतून पालिका वेगळ्या केल्याने अन्याय
 आदिवासी तालुक्‍यात शाळादुरुस्तीला स्वतंत्र हेड नाही
 पडक्‍या घरकुलांच्या इमारतीचा दुरुस्ती खर्च मिळावा
 डिजिटल अंगणवाड्यांना वीजपुरवठा मिळत नाही
 पालिका क्षेत्रातील अंगणवाड्यांत जि.प.ने हस्तांतरित कराव्यात
 दुष्काळात मजुरांना कामे मिळत नाहीत

९१८ कोटींचा आराखडा
जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा सुमारे ९१८ कोटींचा प्रस्तावित आराखडा आणि गेल्या वर्षीच्या ७१४ कोटींच्या आराखड्यातील ७४ टक्के निधी खर्च झाला. आचारसंहितेपूर्वी शंभर टक्के निधी खर्च होईल, असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com