नाशिक : आनंदाने आपल्या मामाच्या घरी येत असलेला श्रीरामपूर जिल्ह्यातील खोकर भोकर गावातील इयत्ता चौथीत शिकणारा साई खेडकर या चिमुकल्यावर ऐन दिवाळीत पाडव्याच्या दिवशी काळाने घात केल्याने त्याचा मृत्यू झाला.
सोमवारी (ता.२८) सायंकाळी साडेसात आठच्या दरम्यान डुबेरे (ता.सिन्नर) बस स्टॅन्डवरून मामा रामेश्वर माळी यांच्यासोबत साई आनंदाने आपल्या मामाच्या गाडीवरून घरी येत होता. घराजवळ आले असताना पावसामुळे चिखल असल्याने मामा रामेश्वर माळी यांनी गाडी दूर उभी करून घराकडे जात असताना अचानक साईने मामांचा हात सोडून घराच्या दिशेने धाव घेतली. परंतु घराच्या मार्गालगत न बांधलेल्या विहिरीचा साईला अंदाज न आल्याने विहिरीत पाय घसरून साई ९० फूट विहिरीत पडला. मामा रामेश्वर माळी पाठीमागून येत असताना हे बघितले व त्यांनीही लगोलग उडी मारली. अंधारमय वातावरणात हा प्रसंग घडला. रामेश्वर माळी यांना पोहता येत नाही परंतु भाच्याचा जीव वाचवण्यासाठी ७० फूट पाणी असलेल्या विहिरीत जीवाची पर्वा न करता उडी घेतली. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही .
रात्री दोन वाजेपर्यंत सिन्नर नगरपालिका व माळेगाव एमआयडीसी अग्निशामक दल कर्मचारी शव बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करत होते परंतु त्यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर बेलू येथील जीव रक्षक गोविंद तुपे यांनी प्रयत्न सुरू केले. परंतु रात्रीची वेळ व पावसाची सतत रीप रीप, परिसरात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीने पाण्याची पातळी खूपच वर आल्याने व विहीरही बांधीव नसल्याने मोठी अडचणी निर्माण होत होत्या. रात्री दोन नंतर मदत कार्य बंद करण्यात आले. सकाळी मदत कार्य पुन्हा सुरू करण्यात आले . नाशिक जिल्हाधिकारी सुरज मांढरे त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला त्यांनीही तातडीने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मदत पोहोचवली. माजी आमदार राजाभाऊ वाजे, तहसीलदार राहुल कातोरे, प्रशांत वाकचौरे, अग्निशामक दल, पोलीस दल, जीवरक्षक गोविंद तुपे, सागर गडाख, विलास गांगुर्डे यांच्या समन्वयाने सतरा तासानंतर साईचे शव बाहेर काढण्यात यश आले. दुर्दैवी घटनेने डुबेरे परिसरामध्ये शोककळा पसरली. स्थानिक तरुणांनी मोठ्या प्रमाणात परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मदत केली.
शेतकऱ्यांनी आपल्या घरा जवळच्या परिसरातील विहिरींना कठडा बांधून परिसर सुरक्षित करायला हवा. जेणेकरून साई सारख्या दुर्दैवी घटना भविष्यात टाळता येतील - जिल्हाधिकारी सुरज मांढरे
सण-उत्सव बाजूला ठेवून जीवरक्षक प्रशासनासोबत कठीण प्रसंगी काम करण्यास तत्पर असतात. प्रशासनाने जीव रक्षकांच्या अडचणी लक्षात घेऊन यांच्याही प्रश्नांकडे गांभीर्याने बघावे .जीवन रक्षकांना मिळणारे किट त्यामधील ऑक्सिजन संपल्यानंतर त्यातील त्यासाठी लागणारे खर्च. जोखमीचे कामे करताना झालेल्या दुखापती यासाठी लागणारा वैद्यकीय खर्च प्रशासनाने मंजूर करावा - गोविंद तुपे, जीवरक्षक
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.