वाढीव आरक्षणासाठी वंजारी समाजाचा 11 ला एल्गार

Residential photo
Residential photo

जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा 

नाशिक : राज्यातील वंजारी समाजाला देण्यात आलेले 2 टक्‍क्‍याचे आरक्षण समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अत्यल्प आहे. त्यामुळे समाजाने 10 टक्के वाढीव आरक्षण मिळावे, या मागणीसाठी येत्या बुधवारी (ता.11) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. क्रांतिवीर वसंतराव नाईक आरक्षण कृती समितीतर्फे मोर्चाचे नेतृत्व करण्यात येणार असून जिल्ह्यातील वंजारी समाजबांधवांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. 

क्रांतिवीर व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेच्या कार्यालयात आरक्षणासंदर्भात समितीतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली असता, त्यावेळी आमदार किशोर दराडे, व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी मोर्चासंदर्भात माहिती दिली. राज्यातील वंजारी समाजाला एन.टी-डी प्रवर्गातून 2 टक्के आरक्षण दिले असून ते तोकडे आहे. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक पात्रता असून, आरक्षणाअभावी उच्च शिक्षणाच्या संधीपासून समाजातील मुलांना वंचित रहावे लागते आहे. त्यामुळे वंजारी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात वाढीव आरक्षण मिळावे अशी मागणी क्रांतीवीर वसंतराव नाईक आरक्षण कृती समितीने केली आहे. 
येवला येथे समाजबांधवाचा मेळावाही घेण्यात आला असून मोर्चा काढण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता. त्यानुसार, येत्या बुधवारी (ता.11) आरक्षणासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता नाईक शिक्षण संस्थेच्या प्रागंणात समाजबांधव जमतील. त्यानंतर 12 वाजता व्ही. एन. नाईक महाविद्यालयापासून मोर्चाला प्रारंभ होऊन, कॅनडा कॉर्नर, राजीव गांधीभवन, पंडीत कॉलनीमार्गे गंगापूर रोड आणि, परत डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर मोर्चा येईल. यानंतर पाच कन्या मोर्चाची पार्श्वभूमी विशद करतील. तसेच पाच जणांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना निवेदन देतील, त्यानंतर मोर्चाचा समारोप होईल. 
सदरच्या मोर्चाच्या नियोजनासाठी तालुकानिहाय बैठकूा, गावा-गावात जनजागृती सुरू आहे. शहरातील विविध भागातही बैठका सुरू असून कुटुंबियांसह मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी विलास आव्हाड, शाम बोडके, बाळासाहेब गामणे, माणिक सोनवणे, प्रकाश घुगे, सचिन दराडे, गुरूनाथ कांदे, विक्रम नागरे, चारूदत्त उगले आदी उपस्थित होते. 
 
या आहेत मागण्या 
* जातनिहाय जगगणना करण्यात यावी 
* लोकसंख्येच्या प्रमाणात समाजाला वाढीव 10 टक्के आरक्षण द्यावे 
* उद्योग-व्यवसायासाठी शासनाने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे 
* विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय शासकीय वसतिगृहाची उभारणी करावी 
* स्व. गोपीनाथ मुंडे महामंडळाची स्थापना करण्यात यावी 


राज्यातील वंजारी समाजाला कोणत्याही समाजाच्या आरक्षणात वाटेकरी व्हायचे नाही. समाजाला स्वतंत्र 10 टक्के आरक्षण द्यावे. यासाठी समाजातील राजकीय नेत्यांनी पक्षीय मतभेद बाजुला सारून समाजबांधवांसाठी एकत्र आले पाहिजे. लढा तीव्र करण्यासाठी टप्प्या-टप्प्याने प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढला जाईल आणि मुंबईत राज्यस्तरीय मोर्चाचेही आयोजन केले जाईल. 
- किशोर दराडे, आमदार. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com