वाळूसाठी जो आडवा येईल त्याला आडवा पाडू - किशोर पाटील

MLA-Kishor-Patil
MLA-Kishor-Patil

पाचोरा - राज्य शासनाच्या हेकेखोर व आडमुठ्या धोरणामुळे वाळू उपलब्ध होत नसल्याने सर्वच कामे बंद पडली आहेत. ही कामे सुरू न झाल्यास कोट्यवधी रुपयांचा निधी ‘मार्च एंडिंग’मुळे परत जाईल. त्यामुळे आता शासनाने त्वरित यासंदर्भात निर्णय घ्यावा. सोमवार पावेतो याबाबत निर्णय न झाल्यास मी स्वतः संबंधित कामासाठी लागणारी वाळू ठेकेदारांना सोबत घेऊन त्यांच्या कामापर्यंत पोचवेल. यावेळी जो कोणी आडवा येईल, त्याला आडवा करू; पण कामासाठीची वाळू घेऊ, असा निर्वाणीचा इशारा आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

आमदार पाटील यांनी आज दुपारी शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन शासनाच्या वाळू वाहतुकीसंदर्भातील भूमिकेवर टीका करून आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी स्पष्ट केले की येत्या दहा मार्चपर्यंत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे राज्य शासनाकडून जी विविध स्वरूपाची विकास कामे मंजूर करण्यात येऊन त्यासाठीचा निधी मंजूर केलेला आहे. त्या कामांसाठी वाळू मिळत नाही.

आमदार फंड, जलयुक्तची कामे, अर्थसंकल्पीय कामे, जिल्हा परिषद व नगरपालिका माध्यमातील कामे, दलित वस्ती व अल्पसंख्याक सुधारची कामे व घरकुल योजनेची कामे वाळूअभावी बंद पडली आहेत. शासनाने यासाठी मंजुरी व वर्क ऑर्डर दिली आहे. ऑर्डर देताना त्या कामासाठी लागणाऱ्या वाळूचा पैसा शासनाने वसूल केला आहे. ही कामे बंद असल्याने मार्च एंडिंगपर्यंत ही कामे पूर्ण होणार नाहीत व त्या कामांबाबतचा निधी परत जाऊन ही कामे रखडण्याची भीती आहे. या विषयासंदर्भात मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना वेळोवेळी सुचित केले. वाळूअभावी होणाऱ्या नुकसानीची जाणीव करून दिली. अधिवेशनात व नियोजन बैठकीत विषय मांडला आणि निवेदनेही दिली. परंतु अद्यापपावेतो याबाबत कोणीही लेखी आश्वासन दिले नाही अथवा ठोस निर्णय झाला नाही. आता लोकशाही मार्ग संपला आहे.

मंत्रिमंडळाने व संबंधित अधिकाऱ्यांनी सोमवार (ता. ७) पर्यंत याबाबत निर्णय न घेतल्यास मी स्वतः मतदारसंघातील जेवढी कामे आहेत तेवढ्या सर्व ठेकेदारांना एकत्रित करून त्यांना लागणारी व शासनाने निश्‍चित केलेली वाळू त्यांच्या कामापर्यंत पोहोचवेल. या वाळू वाहतूकप्रसंगी जिल्हाधिकारी, महसूल अधिकारी, पोलिस अधिकारी यापैकी जो कोणी आडवा येईल त्याला आडवा करून वाळू घेऊ. कोणत्याही परिणामाची चिंता करणार नाही. यातून काही विपरीत घडल्यास त्याची जबाबदारी शासन व अधिकाऱ्यांची राहील, असा निर्वाणीचा इशारा आमदार पाटील यांनी यावेळी दिला. उपजिल्हाप्रमुख ॲड. दिनकर देवरे, गणेश पाटील, जि. प. सदस्य रावसाहेब पाटील, विकास पाटील, संजय पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, गणेश परदेशी, राजेश पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com