राजकीय पदाधिकाऱ्यांची वाळू चोरीसाठी ‘सेटिंग’

setup of Political office bearers for sand theft
setup of Political office bearers for sand theft

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ज्या गावातून आजपर्यत वाळूचा कण देखील ग्रामस्थांनी जाऊ दिला नाही. लिलावाला वेळोवेळी विरोध केला, त्याच गावातील 300 ब्रास वाळू जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने चाळीसगाव पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी देण्याचा प्रयत्न होत आहे. या संदर्भातील पत्र घेऊन चार डंपर व ‘जेसीबी’ला ग्रामस्थांनी विरोध करून वाळू उचलू दिली नाही. त्यामुळे वाळू उपशासाठी ग्रामस्थ पुन्हा एकवटले आहेत. 

वरखेडे (ता. चाळीसगाव) बॅरेज प्रकल्पाच्या कामावर निघत असलेल्या वाळूपैकी 300 ब्रास अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी चाळीसगाव पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी उचलण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार, वाळू घेण्यासाठी चार डंपर व एक ‘जेसीबी’ आले असता, त्यांना ग्रामस्थांनी वाळू भरू दिली नाही. येथील वाळू उपसा होण्याला ग्रामस्थांनी वेळोवेळी विरोध केलेला असतानाही महसूल प्रशासनाने परवानगी देऊन वाळू चोरांनाच जणू आमंत्रण दिल्याचा प्रकार होत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. 

  • धरणाचे काम बंद पाडू -

चाळीसगाव पालिकेने शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी वरखेडे-लोंढे बॅरेजच्या खोदकामातून निघणआरी 300 ब्रास वाळू उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. जिल्हा प्रशासनाने त्याला परवानगी दिली असली, तरी ग्रामस्थांनी मात्र विरोध कायम ठेवला आहे. वाळू उचलण्यासाठी आलेली वाहने ग्रामस्थांनी परत पाठवली असली तरी पुन्हा वाळू उपसा होण्याची शक्यता असल्याने तसे झाल्यास, धरणाचे काम ग्रामस्थ बंद पाडतील, असा इशारा येथील सरपंच अर्चना पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिला आहे. 

  • वाळू माफियांचा डोळा -

वरखेडे गावातील वाळूचा लिलाव करण्यासाठी काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी ‘सेटिंग’ लावल्याची चर्चा सुरू आहे. येथील वाळू लिलावावर अनेकांचे लक्ष लागले आहे. सहा महिन्यांपूर्वी महसूल विभागाने गावात दहा दिवसांत दोन ग्रामसभा घेतल्या, त्यात सरपंचांसह संपूर्ण गावाने विरोध केल्याने वाळूचा लिलाव करू नये, असा ठरावच केला. यात ‘गाव करील ते राव काय करील’ याचाच प्रत्यय आला. 

  • जामदा धरणातून वाळूचा उपसा व्हावा -

जामदा (ता. चाळीसगाव) धरणात गाळ व वाळू असल्याने या धरणात पावसाचे पाणी टिकून राहत नाही. यामुळे या धरणातून वाळू उपसा झाल्यास धरणाच्या खोलीकरणाचे देखील काम होईल. शिवाय पाणी साठवण क्षमता देखील वाढेल. यासाठी शासनाचा होणारा खर्च देखील वाचणार आहे. त्यामुळे चाळीसगाव पालिकेच्या कामासाठी जामदा धरणातून वाळू उपसा करण्याला परवानगी द्यावी, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

आम्हाला वरिष्ठांच्या आदेशानुसार काम करावे लागणार आहे. याबाबतीत ग्रामस्थांनी देखील त्यांचे म्हणणे आमच्याकडे रितसर सादर करावे. त्यांचे निवेदन वरिष्ठांकडे पाठवले जाईल. त्यानंतर जो काय निर्णय घ्यायचा ते वरिष्ठ अधिकारी घेतील. 
- नानासाहेब आगळे, नायब तहसीलदार, चाळीसगाव 

धरण भागातील वाळू उचलण्यासंदर्भात तहसील प्रशासनाने आमच्याशी कुठलाही पत्रव्यवहार केलेला नाही. यापूर्वी देखील वाळू लिलावाला विरोध केला असून आजही तो कायम आहे. संपूर्ण ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेऊन प्रशासनाने वरखेडे येथील वाळू उचलू नये. 
- अर्चना पवार, सरपंच, वरखेडे (ता. चाळीसगाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com