सतरा हजार शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळणार कधी ?

सतरा हजार शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळणार कधी ?

संतोष विंचू ः सकाळ वृत्तसेवा
येवला ः बाजारभाव पडल्याने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी मोठ्या दिमाखात शासनाने क्विंटल मागे 200 रुपये अनुदान जाहीर केले. पण तीन ते चार महिने उलटूनही शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर बियाणे खरेदीसाठी अनुदान द्यावे, अशी अपेक्षा दुष्काळात सापडलेले शेतकरी व्यक्त करीत आहेत.
शासनाच्या धोरणामुळे गेल्यावर्षी शेतकऱ्यांना चाळीतील उन्हाळ कांदा अक्षरशः शंभर रुपये प्रतिक्विंटलने विक्री करावा लागला होता. दिवाळीनंतर बाजारात आलेल्या पोळ कांद्याची हीच गत राहिली आणि भाव 50 ते 200 रुपयांपर्यंत मिळाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलने व टीका केली होती. त्यामुळे शासनाने ऑक्‍टोबरपासून पडलेल्या दराचा विचार करून शेतकऱ्यांना 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत विक्री झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान जाहीर केले. नंतरही भावात सुधारणा न झाल्याने पुन्हा शासनाने यात वाढ करून दुसऱ्या टप्प्यात महिन्याची व पुन्हा महिन्याची अशी तीन वेळेस मुदतवाढ दिली. शेतकऱ्यांना फेब्रुवारी अखेरपर्यंत विक्री केलेल्या कांद्याला अनुदान मिळणार आहे. झालेले नुकसान भरून निघणार नाही, पण गुंतवलेले भांडवल मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी या निधीचे स्वागत केले. मात्र, योजना जाहीर होऊन सहा महिने उलटले तरी शेतकऱ्यांना पूर्णपणे अनुदान मिळू शकलेले नाही. येथील बाजार समितीत 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरदरम्यान पाच हजार 178 शेतकऱ्यांनी एक लाख 85 हजार क्विंटल कांदा विक्री केला होता. त्यापोटी तीन कोटी 71 लाख 69 हजारांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले आहे. हा पहिला टप्पा पूर्ण झाला. त्यानंतर शासनाने अनुदान न दिल्याने शेतकरी खरिपासाठी तरी हा आधार मिळेल, या अपेक्षेने प्रतीक्षा करताहेत. येथील बाजार समितीत 16 डिसेंबर ते 28 फेब्रुवारीदरम्यान 17 हजार 97 शेतकऱ्यांनी दहा लाख 26 हजार क्विंटल कांदा विक्री केला आहे. त्याचे 20 कोटी 52 लाख 42 हजारांचे अनुदान अद्याप येणे बाकी आहे. जाहीर झालेली रक्कम मिळत नसल्याने शेतकरी खरिपाच्या तोंडावर अनुदानाची चातकासारखी वाट पाहात आहेत.

प्रतिक्रिया
येथील बाजार समितीत 19 हजार 945 शेतकऱ्यांनी अनुदानासाठी अर्ज केले होते. यातील दोन हजार 809 दुबार व 39 अपात्र ठरले. उर्वरित शेतकरी पात्र झाले असून, दुष्काळामुळे मोठ्या आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना शासनाने खात्यावर तत्काळ अनुदान वर्ग करून आधार द्यावा. यामुळे खरिपाचे बियाणे खरेदीसाठी मोठा आर्थिक आधार मिळेल.
- उषा शिंदे, सभापती, बाजार समिती, येवला  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com