नाशिक - अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी भाजपने केलेला भूमिपूजनाचा सोहळा म्हणजे भपका असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी केली.
विकासकामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले आहेत. शासकीय विश्रामगृहावर आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये केलेल्या कामांची माहिती दिली आणि शिवस्मारकावरून पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केले. ""पुतळे उभारण्यास माझा विरोध असल्याचे सांगताना नुकतेच शिवस्मारकाचे उद्घाटन करण्यात आले; परंतु ते फक्त संकल्पना चित्र आहे. पूर्व शक्यता अहवाल मिळण्यापूर्वीच उद्घाटन करण्याची घाई करण्यात आली. शिवस्मारकाचे उदघाटन म्हणजे निव्वळ भपकेपणा आहे. समुद्रात भर टाकून स्मारक उभारले जाणार आहे त्या भर टाकलेल्या जमिनीवर स्मारक किती टिकेल,'' असा सवाल त्यांनी केला.
नाशिक महापालिकेत मनसे सत्तेत नसती तर देशाच्या उद्योग जगतातील टाटा, अंबानी नाशिकमध्ये आले असते का? असा सवाल करत राज यांनी आतापर्यंत केलेल्या विकासकामांची नाशिककरांनी दखल न घेतल्यास दुर्दैवच म्हणावे लागेल, अशी टिप्पणी केली. गेल्या दोन वर्षांत मनसेचे 25 नगरसेवक भाजप, शिवसेनेमध्ये गेले, या विषयावर बोलणे त्यांनी टाळले. परंतु, जे गेले त्यांना भविष्यात पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नसल्याचे सांगताना पक्षांतर केलेल्या नगरसेवकांना इशारा दिला.
|