नाशिक - ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश राज्यांत फणी वादळाने मोठे नुकसान झाले. फणीने प्रभावित झालेल्या राज्यातील वादळग्रस्तांपर्यंत येणाऱ्या मदतीची मोफत वाहतूक करण्याचा रेल्वेने निर्णय घेतला.
मदतीसाठी दिले जाणारे मदत साहित्य रेल्वे प्रशासन मोफत संबंधितांपर्यंत पोचविणार आहे. मध्य रेल्वे प्रशासन प्रवासी आणि मालवाहतूक रेल्वेच्या पार्सल व्हॅन/वीपी/एसएलआर गाड्यांतून हे साहित्य ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशात पोचविणार आहे. मदत साहित्य पोचवू इच्छिणारे नागरिक मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर विभागांच्या विभागीय प्रबंधनामार्फत मोफत साहित्य पाठवू शकणार आहेत. मात्र मदत साहित्य पाठविण्यासाठी जिल्हाधिकारी, सहायक आयुक्तांची शिफारस लागणार आहे. "फणी'ग्रस्त राज्यात पोचविल्या जाणाऱ्या मदत साहित्यावर डॅमरेज शुल्क, वारफेज शुल्कासह इतर कुठलेही शुल्क लागणार नाही. येत्या 2 जूनपर्यंत ही सवलत आहे.
|