खानदेश धगधगतंय! रावेर - ४८, पाल - ४७.५, जळगाव - ४५

Temperature
Temperature

रावेर - ४८, पाल - ४७.५, जळगाव - ४५
जळगाव/रावेर/धुळे/नंदुरबार - संपूर्ण राज्य उष्णतेच्या लाटेत होरपळत आहे. खानदेशातही गेल्या तीन- चार दिवसांपासून उष्णतेची दाहकता अधिक तीव्र होत गेली आहे. जळगावातील पारा ४५ अंशांवर स्थिरावला आहे.

जिल्ह्यातील रावेर येथे ४८, तर पाल या थंड हवेच्‍या ठिकाणी ४७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. धुळ्यात ४५, तर नंदुरबार जिल्ह्यात ४६ अंशांच्‍या जवळपास तापमानाने मजल मारली आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास महामार्गावरील तापमान ४७.८ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते.खानदेशात चार-पाच दिवसांपासून असलेली उष्णतेची लाट कायम आहे. जळगावला आज (२७ एप्रिल) सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस इतक्‍या तापमानाची नोंद ममुराबाद हवामान विभागाकडे झाली आहे. सकाळी नऊपासून उन्हाची तीव्रता जाणवत होती. सायंकाळी सातपर्यंत उन्हाच्या झळा कायम होत्या. 

भुसावळचा पारा ४६ अंशाच्यावर पोहचला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन चांगलेच प्रभावित झाले आहे. गेल्या आठवड्यापासून तापमान ४२ अंशांच्यावर कायम आहे. तापमानाने तीन दिवसांतच ४५ अंशांचा पारा गाठला आहे. 

धुळ्यात ४५ अंशांवर
चार दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढतच आहे. आठवडाभरापूर्वी कमी झालेल्या तापमानाने आज ४५ अंशांचा टप्पा गाठला. धुळेकर एप्रिलच्या सुरवातीपासूनच वाढत्या तापमानामुळे हैराण झाले आहेत. त्यात आणखी वाढ झाल्याने उष्णतेच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत.

नंदुरबारलाही ताप
नंदुरबार जिल्‍ह्‍यात एप्रिलअखेरीस तळोदा, शहादा, नंदुरबार या भागांतील तापमानाचा पार ४६.१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला.उन्‍हामुळे या जिल्‍ह्‍यातील जनजीवन विस्‍कळित झाले आहे.उन्‍हाचा त्रास टाळण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडणे बंद केले आहे. दुपारच्‍या वेळेस येथील रस्‍ते निर्मनुष्य होतात. मात्र निवडणूकांचा प्रचार करण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते भर उन्‍हात जीवाचे रान करीत आहेत.

उन्हात बाहेर पडू नका - मंजुळे
उष्माघात टाळण्यासाठी तहान लागलेली नसतानादेखील जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. बाहेर जाताना गॉगल्स्, छत्री, टोपी, बूट व चपलांचा वापर करावा. नागरिकांनी भरउन्हात दुपारी बारा ते चार या वेळेत शक्यतो बाहेर पडू नये. ज्यांना अपरिहार्यपणे बाहेर पडावयाचे आहे, त्यांनी डोक्यावर टोपी, रुमाल आदी आच्छादन ठेवावे. मगच बाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी केले आहे.

रावेरमध्ये जनजीवन ठप्‍प
रावेर शहर अक्षरशः धगधगतय.  येथे ४८ डिग्री तापमानाची नोंद झाल्याने जनजीवन होरपळून निघाले. दुपारी जवळपास सर्वच व्यवहार ठप्प झाले होते.आज सकाळी ११ वाजेपासूनच वातावरण तापायला सुरवात झाली होती. रस्त्यावर चालतांना चेहऱ्याला तप्त हवेच्या झळा लागत होत्या. दुपारी दीडला अनेक स्वयंचलित यंत्रांवर आणि मोबाईल वरील अँप्स वर ४७ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दुपारी चार वाजता तापमानाने ४८ चा आकडा गाठला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com