नाशिक : जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने "भाजप' सोबत न राहता शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देण्याचे ठरविले असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, युवा आघाडी अध्यक्ष हंसराज वडघुले यांनी सांगितले.
कांदा शेती संकटात सापडली आहे. कांदा परवडत नसल्याने तो शेतात पेटवून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मोदी सरकारने स्वामिनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हा आयोग लागू न करून सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. केंद्रातील तसेच राज्यातील भाजप शासनाने शेतकरी विरोधी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मोठ्या संकटात टाकले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संख्येत वाढ झाली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटून सांत्वन करण्याचे औदार्यही शासनकर्त्यांनी दाखविले नाही.
घटक पक्षांना कुठल्याही टप्प्यावर विश्वासात घेतले नाही. भाजपचे स्थानिक नेते तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अस्तित्वाबद्दलच शंका व्यक्त करीत आहेत. नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वेळोवेळी मोठी आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधले आहे. या पार्श्वभूमीवर या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपच्या विरोधात शिवसेनेसोबत प्रचार करण्याचे ठरविले असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
|