तापी, गिरणाचे पाणी गेले वाया 

तापी, गिरणाचे पाणी गेले वाया 

भडगाव : यंदाच्या पावसाळ्यात गिरणा व तापी नदीतून किती पाणी वाया गेले असेल, हे ऐकाल तर तुम्ही थक्क व्हाल ! पाच महिन्यात दोन्ही नद्यांमधून तब्बल १० हजार ७५२ दलघमी एवढे पाण्याचा विसर्ग झाला. म्हणजेच जळगाव जिल्ह्यातील तीन मोठे, १३ मध्यम व ९६ लघु प्रकल्प सात वेळा भरले असते. एवढे पाणी तुमच्या आमच्या डोळ्यांदेखत वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आम्ही आमच्या हक्काचे पाणी केव्हा अडवणार आहोत? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 
जळगाव जिल्ह्यातून तापी व गिरणा या दोन प्रमुख नद्या वाहतात. गिरणा नदीवर नाशिक जिल्ह्यात धरण आहे, तर तापीवर हतनूर प्रकल्प आहे. ते भरल्यानंतर पाणी पुढे कुठेही अडविण्याची सोय नाही. त्यामुळे ‘ओव्हरफ्लो’ होणारे पाणी दरवर्षी वाया जाते. मात्र, या वाया जाणाऱ्या पाण्याचे कोणालाही काही एक सोयरसुतक नसल्याचे चित्र आहे. जळगाव जिल्ह्यातून जून ते नोव्हेंबर महिन्यात तब्बल १० हजार ७५२ दलघमी एवढे पाणी वाया गेले आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांची साठवण क्षमता १ हजार ४२७ म्हणजेच ५०.४० टीएमसी इतकी आहे. गिरणा धरणाची साठवण क्षमता ६०८ दलघमी एवढी आहे. यंदाच्या पावसाळ्यात गिरणा धरणातून १ हजार ११७ दलघमी एवढा पाण्याचा विसर्ग झाला. तर हतनूर धरणातून ९ हजार ६३५ दलघमी पाणी वाहून गेले. एवढ्या पाण्यातून हतनूर तब्बल २४ वेळा भरले असते. 

झोळी फाटकीच...! 
तापी नदीवर हतनुर प्रकल्पानंतर कुठेही अद्याप पाणी अडविण्याची व्यवस्था नाही. शेळगाव व पाडळसे प्रकल्पाचे काम बऱ्याच दिवसांपासून अपूर्णावस्थेत आहे. गिरणा नदीवर धरणानंतर कुठेही पाणी अडविले जात नाही. वरखेडे येथील प्रकल्पाला गेल्या वर्षापासून चालना मिळाली आहे. तर सात बलून बंधाऱ्यांना निधीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे सद्यस्थि:तीत तरी गिरणा धरणाचा ‘ओव्हरफ्लो’ वायाच जात आहे. त्यामुळे यंदा एक वेळा गिरणा भरेल इतके पाणी सहा महिन्यांत वाहून गेले आहे. पाणी अडविण्यासाठीची फाटकी झोळी केव्हा शिवली जाईल, असा प्रश्न आता शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. 

नदीजोडला गती देण्याची गरज 
जळगाव जिल्ह्यातून पावसाळ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते. त्यामुळे हे पाणी नदीजोडच्या माध्यमातून इतर भागात वळविणे गरजेचे आहे. ज्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे, अशा भागात हे पाणी वळवायला हवे. कालवे करून ‘ओव्हरफ्लो’ होणारे पाणी उपयोगात येऊ शकते. याशिवाय तापी व गिरणा नदीवरील प्रकल्पाला एकाचवेळी पूर्ण निधी देऊन हे प्रकल्प पूर्णत्वास आणले पाहिजे. त्यामुळे हे पाणी त्या प्रकल्पात अडविणे शक्य होईल. एकीकडे दुष्काळाचे चटके सहन करायचे अन् दुसरीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात असेल तर ते परवडणारे नाही. सर्वच पाणी अडविणे शक्य नसले, तरी त्यातील ३० ते ४० टक्के पाणी अडविले, तरी जिल्हा टँकरमुक्त होऊ शकतो. अर्थात यासाठी लोकप्रतिनिधींनी इच्छाशक्ती दाखविणे तितकेच गरजेचे आहे. 

जिल्ह्यातील सर्व प्रकल्प सात वेळा भरले असते 
जळगाव जिल्ह्यात गिरणा, हतनुर व वाघुर हे मोठे तर १३ मध्यम प्रकल्प आहेत. याशिवाय ९६ लघु प्रकल्प आहेत. या सर्वांची एकूण साठवण क्षमता १ हजार ४२७ दलघमी एवढी आहे. तर यंदा तापी व गिरणा नदीतून बाहेरच्या जिल्ह्यात तब्बल १० हजार ७५२ दलघमी एवढे पाणी वाहून गेले. म्हणजेच जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रकल्प एक दोनदा नव्हे; तर किमान सात वेळा भरले असते, एवढे पाणी वाहून गेल्याचे वास्तव आहे. त्यामुळे हे पाणी अडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी एकत्रितरीत्या शासनाकडे आग्रह धरावा, अशी मागणी होत आहे. 

आकडे बोलतात.... 
जिल्ह्यातील मोठे प्रकल्प ......... ३ 
जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प ...... १३ 
जिल्ह्यातील लघु प्रकल्प ......... ९६ 
गिरणा धरण क्षमता .............. ६०८ दलघमी 
हतनुर धरण क्षमता ............... ३८८ दलघमी 
जिल्ह्यातील साठवण क्षमता ..... १,४२७ दलघमी 
वाहून गेलेले पाणी ............... १०,७५२ दलघमी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com