नाशिक - सोयाबीनला किमान आधारभूत किमतीपेक्षा अधिक भाव मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्वीकारली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बांगलादेश, श्रीलंका, नेपाळमध्ये उत्पादित न होणाऱ्या अन् निर्यात होणाऱ्या सोयाबीन खाद्यतेलावर कर लावावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी ही माहिती दिली.
पटेल म्हणाले, की आशिया राष्ट्रांचे सदस्य असलेल्या देशांमधील उत्पादनाला आयातकर लावता येत नाही. नेमकी हीच पळवाट शोधून बांगलादेश, श्रीलंका, नेपाळमध्ये सोयाबीन तेलाची आयात करून निर्यात करण्याचा धंदा काही जणांनी सुरू केला. ही बाब निदर्शनास येताच, मुख्यमंत्र्यांनी आयातकर लावण्याची विनंती करणारे पत्र पंतप्रधानांसह केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, कृषिमंत्री राधामोहनसिंह, वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांना लिहिले आहे. केंद्राने त्यासंबंधीचे धोरण स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा शंभर रुपये अधिकचा भाव क्विंटलमागे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
|