नाशिक - गेल्या पाच वर्षांपासून रिक्त असलेली माध्यमिक शिक्षकेतरांची पदे भरा; अन्यथा येत्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात विधानसभेसमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
महामंडळाची राज्यस्तरीय बैठक आज रवींद्र विद्यालयात महामंडळाचे अध्यक्ष एस. बी. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात 2012 पासून बंद असलेल्या शिक्षकेतर कर्मचारी भरतीवर प्रामुख्याने चर्चा झाली. सध्या माध्यमिक शाळेतील शिक्षकांची चाळीस हजार पदे रिक्त आहेत. नवीन भरती होत नाही. पदोन्नती, अनुकंपा यांचा विचारही होत नाही.
पदोन्नतीवर बंदी नसतानाही ती दिली जात नाही. ग्रंथपाल पदवीधर वेतनश्रेणीच्या प्रतीक्षेत आहेत. परिचर पदे अनिश्चितेच्या भोवऱ्यात आहेत. अशा विविध समस्यांवर डोंगरे यांनी या वेळी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला व येत्या पावसाळी अधिवेशन काळात एक मोठे आंदोलन करून ही रिक्त पदे भरण्याबाबत शासनाला प्रवृत्त करण्याचा निर्धार करण्यात आला. पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करून दबाव वाढविण्याचे या वेळी ठरले. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींवरही चर्चा झाली.
|