जिल्हा हगणदारी मुक्तीसाठी प्रयत्न

जळगाव - जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पदभार हस्तांतराबाबत स्वाक्षऱ्या करताना जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल आणि नूतन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर.
जळगाव - जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पदभार हस्तांतराबाबत स्वाक्षऱ्या करताना जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल आणि नूतन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर.

जिल्हाधिकारी निंबाळकर; चौपदरीकरणाच्या कामास गती देणार
जळगाव - जिल्ह्याचा विकास करण्यासाठीच मी आलो आहे. सर्वांगीण विकास कसा करता येईल, यासाठी आधी जिल्ह्याची माहिती घेत आहे. तूर्तास महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामात लक्ष घालून महामार्ग लवकरात लवकर होण्यावर भर देईल. तसेच जिल्हा २०१८ पर्यंत हगणदारीमुक्त, स्वच्छ जिल्हा निर्माण करण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती आज नवे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी आज येथे दिली.

श्री. निंबाळकर यांनी आज पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर सायंकाळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

ते म्हणाले, की प्रत्येकाला घर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्यासाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लक्षांक देण्यात आला आहे, तो पूर्ण करण्याकडे कल राहील. मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत रखडलेल्या पाणी योजना पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते पूर्ण करण्यात येतील. लोकराज्यच्या पोर्टलवर नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारी लागलीच सोडविण्याकडे आपण लक्ष दिले जाईल. जिल्ह्यातील आदिवासी भागातील पाड्यांची रचनात्मक आखणी करून त्यांना गावांचा दर्जा ‘पेसा’ योजनेंतर्गत देण्यात येईल. 

सातबारा संगणकीकरण
सर्व्हर डाऊन असल्याने जिल्ह्यातील ७/१२ संगणकीकरणाचे काम रखडले होते, ते आता सुरू झाले आहे. मेअखेरपर्यंत सर्व ७/१२ उतारे संगणकीकृत होतील. तशा सूचना तलाठी, मंडळाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्ह्यात महसूल वसुलीवर भर दिला जाईल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले वाळूचे ठेके कंत्राटदार का घेत नाहीत, त्याकडे लक्ष देवून वाळू ठेक्‍याचा प्रश्‍न सोडविला जाईल, असेही श्री. निंबाळकर यांनी स्पष्ट केले. 

शाळांच्या गुणवत्तेवर भर
जिल्हाधिकारी म्हणाले, की जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यावर भर जाईल. शाळांच्या इमारती, तेथील सोईंकडे लक्ष दिले जाईल. सर्वच शाळांचे डिजिटलायझेशन केले जाईल. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. ज्या ठिकाणी पाणी टंचाई भासेल, अशा ठिकाणी टॅंकर सुरू करून इतर योजना राबविल्या जातील. जळगाव जिल्हा हगणदारीमुक्त, स्वच्छ जिल्हा कसा होईल याकडे विशेष लक्ष असेल.

टीमला ‘गिअरअप’ करणार
श्री. निंबाळकर यांनी सांगितले, की विकासासाठी एक ‘टीमवर्क’ लागते. ‘टीमवर्क’शिवाय विकास कसा होईल? जिल्ह्यातील महसूल विभागाच्या टीमला ‘गिअरअप’ करावे लागेल. संबंधित अधिकाऱ्यांना लिडरशीप देवून ‘बूस्ट’ देवू. ठरविलेले काम होण्यासाठी ते शेवटच्या कर्मचाऱ्यांपर्यंत योग्य प्रकारे पोचले, तरच ते तडीस जाईल. यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील यशस्वी संवादावर भर दिला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com