हा तर १२७ नगरसेवकांचा विजय - भानसी

Nashik-Municipal
Nashik-Municipal

नाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हुकूमशाहीला बदली हेच उत्तर असून, हा सर्व १२७ नगरसेवकांचा विजय असल्याचा दावा करत नाशिककरांसाठी घेतलेले अहितकारक निर्णय सर्वपक्षीय गटनेत्यांशी चर्चा करून रद्द केले जातील, अशी माहिती महापौर रंजना भानसी यांनी दिली.

आयुक्त मुंढे यांच्या बदलीनंतर महापालिका वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटल्या. बदलीनंतर महापौरांच्या रामायण निवासस्थानी नगरसेवकांनी गर्दी केली. त्या वेळी महापौरांनी माध्यम प्रतिनिधींना सामोरे जाताना शासन निर्णयाचे स्वागत केले. ‘अच्छे दिन’साठी नाशिककरांनी महापालिकेची सत्ता दिली. परंतु आयुक्तपदी मुंढे यांची नियुक्ती केल्यानंतर विकासाला खीळ बसली. मुंढे प्रसिद्धीलोलुप व्यक्ती होते. कामे तर काही झालीच नाहीत, पण त्यांच्या अरेरावीला अख्खे शहर त्रासले होते. लोकप्रतिनिधींचा अवमान करण्यात त्यांनी रस दाखविला. करवाढीला आमचा विरोध नव्हता. झेपेल अशी करवाढ करावी, अशी नगरसेवकांची मागणी होती. स्मार्ट रोडच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करायचे अन्‌ दुसरीकडे शहरातील खेड्यांमध्ये चालण्यासाठीदेखील रस्ते नाहीत हा विरोधाभास त्यांनी दुर्लक्षित केला. लोकप्रतिनिधींना विश्‍वासात न घेता काम करणे, हेकेखोरपणातून नकारात्मक भूमिका त्यांनी घेतली. मुंढे यांनी घेतलेल्या अहितकारी निर्णयांचा फेरविचार केला जाणार असून, त्यात शेतीवरील करवाढीवरदेखील विचार केला जाणार असल्याचे महापौर भानसी यांनी सांगितले.

मुंढे यांचे काम हुकूमशाही पद्धतीचे होते. लोकप्रतिनिधींचे अधिकार डावलत त्यांनी एककल्ली कारभार केला. महात्मा कालिदास कलामंदिर, नेहरू उद्यानाचे परस्पर लोकार्पण करून त्यांनी उर्मटपणा अधोरेखित केला. विश्‍वासात घेऊन काम करणे अपेक्षित असताना त्याच्या उलटे काम त्यांनी केले.
- शाहू खैरे, गटनेता, काँग्रेस

मुंढे यांनी अन्यायकारक करवाढ करून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे. बदली झाल्यानंतर आता लादलेली करवाढ रद्द करण्यासाठी आमचा पुढील लढा राहील.
-उद्धव निमसे, नगरसेवक

मुंढे हेकेखोर अधिकारी आहेत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनात समन्वय राहिला तरच विकास होऊ शकतो. मुंढेंना हे मान्य नव्हते. आमदार निधीतील विकासकामेही त्यांनी नाकारली. नवीन आयुक्तांना सहकार्य करून रखडलेला विकास साध्य करू.
- बाळासाहेब सानप, आमदार

बारा वर्षांत ११ वेळा बदली झालेला अधिकारी चांगला असू शकत नाही. नकारात्मकतेमुळे प्रत्येक ठिकाणी मुंढे यांना बदलीला सामोरे जावे लागले. मुंढे यांचे नाशिककर समर्थन करू शकत नाहीत. त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेले मॅनेज होते. हुकूमशाही मुंढेंची बदली होणे योग्य आहे.
-दिनकर पाटील, सभागृहनेते

विकासकामांपेक्षा मुंढे यांनी वादालाच खतपाणी घालण्याचे काम केले. नाशिककरांवर कर लादणे, अधिकारी, कर्मचाऱ्यांना कायम दडपणाखाली ठेवले. निम्म्याहून अधिक शहर त्यांनी अनधिकृत ठरवून दहशत निर्माण केली. शिवसेनेने त्यांच्या चुकीच्या कामांना कायम विरोध केला. 
- अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते

मुंढे यांनी शहर भकास करण्याचे काम केले. शेतीवर कर लादणे, अंगणवाड्या व शाळा बंद करून नागरिकांना वेठीस धरले. लोकप्रतिनिधींचा अवमान करून त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र त्यांनी रचले. त्यांच्या बदलीचा निर्णय योग्यच आहे.
- सलीम शेख, गटनेता, मनसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com