वरखेडे-लोंढे बॅरेजच्या कामाने घेतला वेग; दरवाजांचे काम पूर्णत्वाकडे 

chalisagav.jpg
chalisagav.jpg

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : खानदेशातील अत्यंत महत्वकांक्षी असलेल्या वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्पाच्या तेरा दरवाजांचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. सध्या सर्व प्रकाराची यंत्र सामुग्री उपलब्ध असल्याने कामाने गती घेतली आहे. या प्रकल्पात पुढील वर्षाच्या पावसाळ्याचे पाणी अडविण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन आहे. यामुळे चाळीसगाव व भडगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्पाच्या तेरा दरवाजे बसविण्याचे काम रात्रं दिवस सुरु असल्याने ते पूर्णत्वाकडे आले आहे. मोठ्या क्रेन मशिनद्वारे लोखंडी पत्रे उचलून बसविले जात आहे. एका दरवाजाची लांबी 12 मीटर असून हे दरवाजा बनविण्याचे काम एप्रिलपासून सुरू झाले आहे.

पाण्यातही काम होणार
गिरणा नदीपात्रात खोदकाम सध्या खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. गिरणा नदीला आवर्तन सुटले तरी पाण्यात हे काम सुरुच राहणार आहे. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. पाण्यात काम करताना विदेशात तयार झालेला पत्र्याचा ब्लॉक वापरण्यात येणार आहे. हा पत्रा ब्लॉक (सिटी फाईल) भारतात तयार होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. नदीला पाणी आल्यानंतर गिरणा पात्रातूनच ते दुसऱ्याला बाजूकडून वळविण्यात येणार आहे. ज्या भागाचे काम पूर्ण होईल, तेव्हा त्या भागाकडून पाणी वळविण्यात येईल. गिरणा नदीपात्रातील खड्डे तयार करण्याचे काम झाल्यावर सिमेंट कॉंक्रिटचे काम करुन दरवाजे लावले जातील.

जल आयोगाकडून पाहणी
या प्रकल्पाची किंमत 526. 64 कोटी असून त्याला "नाबार्ड'कडूनही कर्जपुरवठा मंजुर झाला आहे. या कामाची केंद्रीय जल आयोगाचे वडोदरा (गुजरात) कार्यालयाचे संचालक एम. वर्षाने व उपसंचालक व्ही. एल. भास्कर यांनी नुकतीच पाहणी केली होती. या पाहणीत विस्तृत माहिती संकलीत करुन त्यांनी सुरु असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले होते.

सिंचनाचा मोठा प्रकल्प
वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्प चाळीसगाव व भडगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचाच नव्हे तर शेतीच्या सिंचनाचाही प्रश्‍न सुटणार आहे. या प्रकल्पावर वाळू, खडी व पाणी जागेवरच उपलब्ध असल्याने शासनाचा मोठा खर्च वाचला आहे. सर्व आवश्‍यक ती यंत्र सामुग्री सध्या प्रकल्पावर उपलब्ध आहे. त्यामुळे हे काम पूर्णत्वास येण्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

असा मिळाला प्रकल्पाला निधी 

2014-15 ....... 10.24 कोटी
2015-16 ....... 19.54 कोटी
2016-17 ....... 13 कोटी (15 कोटी अतिरिक्त)
2017-18 ....... 40 कोटी


''जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आपण सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच भरीव निधी मिळाला. त्यामुळेच या कामाला गती मिळाली आहे.
शेतकऱ्यांची स्वप्नपूर्ती होत असल्याचे समाधान आहे.''
- उन्मेष पाटील, आमदार , चाळीसगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com