बारीपाड्यासारखी स्वयंपूर्ण गावे जगासाठी पथदर्शीच

बारीपाडा (ता. साक्री) - सरपंच अनिल पवार यांच्या निवासस्थानी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे औक्षण करीत स्वागत करताना आदिवासी महिला. शेजारी चैत्राम पवार.
बारीपाडा (ता. साक्री) - सरपंच अनिल पवार यांच्या निवासस्थानी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे औक्षण करीत स्वागत करताना आदिवासी महिला. शेजारी चैत्राम पवार.

वार्सा - जन, जल, जंगल, जमीन आणि जनावर ही खरी राष्ट्राची संपत्ती आहे. तिचे आपण रक्षणकर्ते झालो पाहिजेत. अशा पंचसूत्रीतून बारीपाड्यासारखी श्रमदान, लोकसहभागातून स्वयंपूर्ण झालेली गावे आणि त्यांनी विकसित केलेली बाजारपेठ ही जगासाठी पथदर्शी ठरणारी आहे, असे गौरवोद्‌गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज काढले.

श्री. भागवत यांनी आज सकाळी सव्वादहाला २६ वर्षांत स्वावलंबी आदर्श ग्रामनिर्मितीचा यशस्वी प्रयोग राबविणाऱ्या बारीपाड्याला (ता. साक्री) भेट दिली. तेथे दुपारपर्यंत त्यांनी श्रमदान, लोकसहभागातून झालेली सिंचन, वन संरक्षणासह विविध कामांची पाहणी केली. वनभाज्यांची स्पर्धा आणि विविध उपक्रमांची माहितीही घेतली. 

बारीपाड्यासारखी स्वयंपूर्ण गावे जगासाठी पथदर्शीच
नंतर त्यांनी ग्रामस्थांशी मुक्त संवाद साधला. त्यातून प्रभावित झालेल्या श्री. भागवत यांनी सांगितले, की बारीपाड्याची स्वयंपूर्णता अनोखे उदाहरण आहे. श्रमदान, लोकसहभागातून स्वयंपूर्ण झालेल्या या गावाने स्वतः उत्पन्न घ्यायचे आणि विक्री करायचे, अशा पद्धतीने विकसित केलेली बाजारपेठ जगासाठी पथदर्शी ठरणारी आहे. एखाद्याकडे लाखो रुपये असतील आणि अशा आदर्श गावातील व्यक्तीकडे दीडशे पोती धान्य असेल तर दुष्काळी स्थितीत लाखो रुपये नव्हे, तर धान्यच उपयोगात येईल. ते जाणून कृषी क्षेत्रासह जल, जंगल, जमीन, जनावर या राष्ट्रीय संपत्तीचे आपण रक्षणकर्ते होण्याचीच खरी गरज आहे.  

इतरांनी आदर्श घ्यावा
जग एका नव्या दिशेच्या शोधात आहे. एकी, विश्वास आणि मेहनतीच्या बळावर परिवर्तन घडवून बारीपाड्याने विकासाची ही नवी दिशा निश्‍चित केली. या गावाचा आदर्श समोर ठेवत अन्य गावांमध्ये त्या दिशेने प्रयत्न होण्याची आवश्‍यकता आहे. बारीपाड्यातील ग्रामस्थांनी एकीने अथक परिश्रमांच्या बळावर परिवर्तन घडवून आणल्याचे ऐकले होते. आज प्रत्यक्ष बारीपाड्याचे दर्शन घेऊन यशस्वी प्रयोगांची माहिती घेण्याची संधी मिळाली. बारीपाडावासीयांनी माणूस आणि माणुसकी टिकून राहिल्याने गाव चांगले राहते, हे सिद्ध करून दाखविले. मात्र, आहे त्यापेक्षाही आपल्याला गाव चांगले करायचे आहे. चांगुलपणाची ही परंपरा संघटितपणे पुढे न्यायची आहे. आज पैसा हे सर्वस्व झालेल्या जगात समाधानी वृत्तीने राहता येऊ शकते. याबद्दल जगाला अप्रूप वाटत असल्याने लोक नव्या दिशेच्या शोधात आहेत, असे सांगत ही दिशा बारीपाड्याने नक्की केल्याचे गौरवोद्गारही डॉ. भागवत यांनी काढले. बारीपाड्यातील ग्रामस्थांनी घडवून आणलेल्या परिवर्तनाची यशोगाथा देशभरात पोहोचली पाहिजे. हे परिवर्तन स्वतः अनुभवले असल्याने यापुढे जिथे- जिथे संधी मिळेल, त्या ठिकाणी बारीपाड्याच्या प्रयोगांबाबत मी माहिती देईल, असेही ते म्हणाले. बारीपाड्याचे शिल्पकार चैत्राम पवार, डॉ. आनंद फाटक, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. हीना गावित आदी उपस्थित होते. 

आदर्श बारीपाड्यातील क्षणचित्रे
* भागवत यांचे सकाळी सव्वादहाला आगमन
* पारंपरिक आदिवासी नृत्यातून जंगी स्वागत
* अकराशे एकरांत बहरलेल्या जंगलाची पाहणी
* वृक्ष, औषधी वनस्पती, भाज्यांची घेतली माहिती
* श्रमदानातील दगडी, मातीचे बंधारे पाहून समाधानी
* उजाड माळरानावर कष्टाने उभारलेले जंगल पाहून प्रभावित 
* मुक्त संवादात परिवर्तनशील ग्रामस्थांच्या कार्याचे कौतुक
* पोलिस बंदोबस्तात दुपारी सव्वापाचला बारीपाड्याहून रवाना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com