दुष्काळातही पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे केंद्र शासनाच्या उपसचिवाकडून कौतुक

"Water Supply  Scheme in drought
"Water Supply Scheme in drought

येवला  : जागतिक बँकेने गौरवलेल्या व तेलगंना राज्याने आत्मसात केलेल्या येथील ३८ गाव नळपाणीपुरवठा योजनेची केंद्रीय केंद्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागाचे उपसचिव अजित शुक्ला यांनी पाहणी केली. विशेष म्हणजे अभ्यासासाठी या योजनेची पाहणी करण्यात आली असून योजनेच्या कामकाजाचे त्यांनी तोंडभरून कौतुकही केले.

युती शासनाच्या काळात टँकरग्रस्त असलेल्या ३८ गावांना टँकरमुक्त करण्यासाठी कार्यान्वित केलेल्या व नंतर आमदार छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून पूर्णत्वास गेलेल्या या योजनेस सद्यस्थितीत ५६ गावांना टँकरमुक्त केले आहे. विशेष म्हणजे ही योजना शासन नव्हे तर, लोकप्रतिनिधींची व्यवस्थापन समिती चालवत असून असंख्य योजना तोट्यात असताना ही योजना मात्र नफ्यात सुरु आहे. यामुळे हैदराबाद येथे झालेल्या जागतिक बँकेच्या कार्यशाळेत या योजनेचा देशातील अव्वल योजना म्हणून दोन वर्षांपूर्वी गौरव झालेला आहे. तसेच तेलंगणा, आंध्रप्रदेश येथील संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषदांचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या एका समितीने येथे येऊन या योजनेची पाहणी केली होती. त्यानंतर या योजनेच्या धर्तीवर आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यातील सर्व पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

आता भयावह दुष्काळ उद्भवलेला असताना योजनेने आजही ५६ गावांना पाणीटंचाईची झळ सोसू दिलेली नाही. त्यामुळेच शुक्ला योजनेचा अभ्यास करण्यासाठी आले होते. त्यांनी बाभुळगाव येथील योजनेचा जलशुद्धीकरण केंद्राचे कामकाज पाहणी करून साठवण तलावाची देखील पाहणी केली. किती लोकांची तहान ही योजना भागवते, दिवसाला किती पाणी दिले जाते, ग्रामपंचायतीकडून पाणी पाणीपट्टी आकारणी कशी केली जाते, वसुली कशी होते, योजनेचा खर्च काय आहे आणि योजना कशी आहे यासंदर्भात संपूर्ण माहिती त्यांनी या योजनेचे ठेकेदार उत्तम घुले तसेच व्यवस्थापक सतीश बागुल यांच्याकडून घेतली. योजना आणि गावाचा समन्वय कसा आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी नांदेसर ग्रामपंचायतीला भेट दिली. गावाला मिळणारे पाणी, समितीचे कामकाज वसुली व गावात पाण्याचे वितरण आदीं संदर्भात सरपंच सुभाष वाघ व सदस्यांकडून माहिती जाणून घेतली. यावेळी ग्रामीण पाणी पुरवठ्याचे उप अभियंता के. जे. झेंडे उपस्थित होते. योजनेची सविस्तर माहिती घेतल्यावर शुक्ला यांनी स्वतः कार्यालयात येऊन शेरे बुकात योजनेच्या कामकाजाचे कौतुक करणारा शेरा लिहिला.

“दुष्काळातही पाणी पुरवठा करणारी ही अतिशय सुंदर योजना आहे. प्रशासन,लोकप्रतिनिधी व कर्मचारी यांच्यातील सुसंवाद यामुळे योजना सुंदर पद्धतीने चालू असून गावांना वेळेत पाणी देखील मिळते.शासनाचा खर्च यामुळे सत्कारणी लागला आहे.”
- अजित शुक्ला,उपसचिव केंद्रीय समिती
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com