पाटील मातीतले, महाजन गादीवरचे; आम्ही रस्त्यावरचे पहिलवान!

पाटील मातीतले, महाजन गादीवरचे; आम्ही रस्त्यावरचे पहिलवान!

जळगाव - शिवसेनेचे उपनेते तथा सहकार राज्यमंत्री मातीतले, जलसंपदामंत्री गिरीश महाजन गादीवरचे, तर आम्ही जनतेचे प्रश्‍न घेऊन रस्त्यावर उतरतो. त्यामुळे आम्ही रस्त्यावरचे पहिलवान आहोत, असा टोला आज ‘राष्ट्रवादी’चे माजी जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांनी लगावला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षातर्फे आज केंद्र व राज्य शासनाच्या काळात बेरोजगारी वाढल्याच्या निषेधार्थ ‘भजे तळो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना पक्षातर्फे निवेदनही देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली आकाशवाणीजवळील पक्ष कार्यालयापासून मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. गेल्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात देशात बेरोजगारी वाढल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी पक्षातर्फे ‘भजे तळो’ आंदोलन करण्यात आले. आमदार डॉ. सतीश पाटील यांनी भजे तळले तर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी त्याचे वाटप केले. 

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. पाटील यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली. गेल्या साडेचार वर्षांत युवकांना रोजगार देण्यासाठी या शासनाने कोणतेही उपाय केले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांच्या कुस्तीच्या वादात उडी घेत ते म्हणाले, की जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे गुलाबराव पाटील म्हणतात त्याप्रमाणे खरेच गादीवरचे पहिलवान आहेत, तर गुलाबराव पाटील हे मातीतले पहिलवान आहेत. आम्ही खऱ्या अर्थाने जनतेचे प्रश्‍न घेऊन रस्त्यावर येऊन आंदोलन करतो. त्यामुळे आम्ही रस्त्यावरचे पहिलवान आहोत. यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनीही सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली, केंद्र शासन बेरोजगारांना रोजगार देण्यास पूर्णपणे अपयश ठरल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा महानगराध्यक्ष नामदेव चौधरी, युवक जिल्हाध्यक्ष ललित बागूल, महिला आघाडीच्या जिल्हा महानगराध्यक्षा नीला चौधरी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

खडसेंनी स्वत:चीच काळजी करावी - डॉ. पाटील
आमदार डॉ. सतीश पाटील यांनी भाजप नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, की त्यांनी विरोधकांची काळजी करू नये, स्वत:चीच काळजी करावी. तब्बल दोन वर्षांनंतर आणि आता कालावधी संपण्याची वेळ आल्यानंतर अधिकाऱ्यांची बैठक लावण्यात आली आहे. त्यांना त्यांच्याच पक्षात किती न्याय मिळतो, याचा त्यांनी विचार करावा. विरोधकांकडे उमेदवार नाहीत, असे म्हणतात; परंतु आमच्याकडे मी, माजी मंत्री देवकर, ॲड. रवींद्र पाटील यांच्यासह मातब्बर दहा उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांनी विरोधकांच्या उमेदवारीची काळजी करू नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com