जळगाव : आज काही लोक मी किती पाणी पितोय याची मोजणी करतात, परंतु याच पाणी मोजणारांना आपण पाणी पाजणार आहोत असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील म्हसावद येथील जाहिर सभेत ते बोलत होते.
राज्यात जिल्हा परिषद निवडणूकीच्या भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव जिल्हयातून केला. तालुक्यातील म्हसावद येथे भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहिर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते उध्दव ठाकरे यांना टोला त्यांचे नाव न घेता टोला लागवला. ते म्हणाले "आज काल काही लोक आपल्या पाणी पिण्यावरही लक्ष ठेवत आहे. मी किती पाणी पितो याची मोजणी ते करीत असतात. पाण्याची मोजणी करणाऱ्यांना निश्चित पाणी पाजणार आहोत."
यावेळी त्यांनी ग्रामीण भागात विकास करण्यास शासन कटिबध्द असल्याचे सांगितले. अन्न, वस्त्र, निवारा देण्यासाठी शासन राज्यात विविध योजना लागू करीत असून त्यांचा निश्चित जनतेला फायदा होईल. कॉंग्रेस सरकारवर टीका करतांना ते म्हणाले, "त्यांनी शिक्षणाचे खासगीकरण केले आम्ही शिक्षणाचे सावित्रीकीकरण करणार आहोत."
प्रास्ताविक भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी केले.
|