
महापालिकेचे अंतर्गत वादामुळे बंद पडले, समजायला मार्ग नाही. मोठ्या प्रमाणात जलवाहिनीचे तुकडे येऊन पडले.
सोनगीर : धुळ्याला पाणीपुरवठा करणारी तापी योजनेची जलवाहिनी सोनगीर ते बाभळेदरम्यान जुन्या मुंबई-आग्रा महामार्गालगत अनेक दिवसांपासून फुटली असून, लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पाणी सुमारे ५० लांब व २५ फूट उंच उडत असून, त्याची दिशा जुन्या महामार्गाविरुद्ध शेतीकडे असल्याने पिकांचे नुकसान होत आहे.
आवश्य वाचा- धुळे जिल्ह्यातील 'डीपी' प्रश्नी शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी
लवकर दुरुस्ती न झाल्यास जलवाहिनी पूर्ण गोलाकार फुटण्याची शक्यता असून, मोठे नुकसान होईल हे स्पष्ट आहे. दरम्यान, तापी योजनेची नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम चार महिन्यांपासून ठप्प पडले आहे. बाभळे ते सोनगीरदरम्यान नेहमीच जलवाहिनी फुटण्याच्या घटना घडतात. परिणामी, हजारो लिटर पाणी वाया जाते. प्रशासनाने कायमस्वरुपी उपाययोजना न करता तात्पुरती मलमपट्टी केल्याने इकडे पाण्याची नासाडी होताना तिकडे धुळेकरांना पाणी मिळत नसल्याने वणवण भटकावे लागते. सोनगीर- बाभळे जुन्या महामार्गालगत जामफळ प्रकल्पाचे कार्यालय कर्मचारी निवासस्थानाजवळ जलवाहिनी फुटली. मात्र काटे, झाडी व झुडपांमुळे जलवाहिनी फुटल्याचे वाहनांवरून जाताना दिसत नाही.
जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य टळले असले तरी धुळ्याला हाच प्रमुख स्त्रोत आहे. सध्या तापी नदी दुथडी भरून वाहत असली तरी नदीच्या पाण्याची ही स्थिती कायमस्वरूपी नाही. त्यामुळे पाणी काटकसरीने वापरणे व उन्हाळ्यात विशेष नियोजन करणे आवश्यक असताना महापालिकेचे पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना याचे काही सोयरेसुतक नाही. तापी योजनेचे जलशुद्धीकरण केंद्राचे पाणीपुरवठा कर्मचारी अनेकदा या रस्त्याने जातात त्यांना फुटलेली जलवाहिनी दिसते; परंतु लवकर उपाययोजना केली जात नाही. जलवाहिनी टाकून सुमारे २७ वर्षे झाली असून, ती जीर्ण झाली आहे. तिची पाण्याचा दाब सहन करण्याची क्षमताही कमी झाली आहे म्हणून ती वारंवार फुटते. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा कर्मचारींची जवाबदारी वाढली आहे. तापी योजनेच्या जलवाहिनीची नियमित पाहणी करणे गरजेचे आहे.
आवर्जून वाचा- कोरोनाने उतरवली ‘चिल्ड बिअर’ची नशा !
जलवाहिनी टाकण्याचे काम ठप्प
तापी नदीच्या सुलवाडे येथून जलवाहिनीद्वारे जामफळ भरून घेणाऱ्या प्रकल्पात धुळ्याला पाणीपुरवठा करणारी तापी योजनेची जलवाहिनी जात असल्याने जामफळ प्रकल्पाला वळसा घालून नवीन जलवाहिनी टाकणे आवश्यक आहे. तसे कामही सुरू झाले होते. मात्र गेल्या चार महिन्यांपासून हे काम बंद पडले आहे. शेतकऱ्यांनी काम बंद पाडले की महापालिकेचे अंतर्गत वादामुळे बंद पडले, समजायला मार्ग नाही. मोठ्या प्रमाणात जलवाहिनीचे तुकडे येऊन पडले असून, ते पाइप मुलांना खेळण्याचे साधन झाले आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे