चाळीसगाव-धुळे महामार्गावरील खड्यांनी घेतला तरुणाचा बळी 

aaccident.jpg
aaccident.jpg

मेहुणबारे (ता. चाळीसगाव)  : रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी बिकट अवस्था चाळीसगाव-धुळे महामार्गाची झाली आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात रोजच अपघात होत आहेत. बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास चारचाकी चालकाने खड्डे चुकविण्याच्या नादात तरुणाला दुचाकीसह उडविल्याची घटना चाळीसगाव व धुळे जिल्ह्याच्या हद्दीवरील तरवाडे शिवारात घडली. या रस्त्यावरील खड्डे प्रशासनाने तातडीने बुजवावेत, अशी मागणी होत आहे.

चाळीसगाव-धुळे महामार्ग क्रमांक २११ वरील चाळीसगाव ते धुळे पर्यंतच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात रस्त्याच्या खाली वाहन घसरून अपघात होण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. या रस्त्यावर तरवाडे गावाजवळ मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचा चालकांना अंदाजच येत नाही. खड्डे चुकविण्याच्या नादात बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास इण्डिका चालकाने विंचूर (ता. जि. धुळे) येथील दुचाकीवरून जाणारा तरुण उमेश दिलीप बोरसे (वय ३४) याला उडविले. यात तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला.

खड्यांमुळे या तरुणाचा बळी गेल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. चाळीसगाव- धुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालविताना कुठून चालवावे, असा प्रश्‍न चालकांना पडलेला असतो. आकाशातील ताऱ्यांप्रमाणे मोजता येणार नाहीत, असे अगणित खड्डे पडल्याने संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. वाहनधारकांना अक्षरशः कसरत करून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यामुळे अनेकांना मणक्याचे विकार जडले आहेत. बऱ्याच दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान होत आहे. या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष सद्यःस्थितीत किमान खड्डे तरी बुजावेत, अशी आर्त मागणी नागरिकांमधून होत आहे.

खडकीसीमजवळ अपघात
मेहुणबारे ते खडकीसीम दरम्यान दहिवद (ता. चाळीसगाव) येथील शिंदे यांचा खड्ड्यात दुचाकी पडून अपघात झाला होता. ही घटना पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी घडली होती. शिंदे यांना धुळ्याकडून चाळीसगाव येथे जात असताना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकर जाधव यांनी स्वतःच्या गाडीत बसवून मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दोन दिवसांपूर्वी वरखेडे येथील दांपत्य चाळीसगावकडे जात असताना त्यांनाही खड्डे टाळण्याच्या नादात बसचालकाने हुल दिली होती. सुदैवाने जागेवर थांबल्यामुळे पुढील अनर्थ टळला होता.

गिरणा पुलाच्या दोन्ही बाजू कमकुवत
अगोदरच रस्त्याची वाट लागलेली असताना मेहुणबारे येथील गिरणा पुलाच्या दोन्ही बाजू कमकुवत झाल्या आहेत. पूल सध्या वापरण्यायोग्य राहिला नसल्याने या पुलावरून चालताना भीती निर्माण होते. गिरणा नदीवर हा पूल १९७० मध्ये बांधण्यात आला आहे. या पुलाला ४७ वर्षे झाली असून त्याच्या उघड्या अँगलची मध्यंतरी थातूरमातूर डागडुजी केली होती. पुलावर उभे राहिल्यानंतर पूल हलतो. सद्यःस्थितीत किमान दोन्ही बाजूच्या कठड्यांचे भक्कम काम करावे, अशी मागणी होत आहे. दररोज हजाराच्यावर वाहनांची ये- जा असते. औरंगाबदारकडून धुळे, सुरत किंवा इंदोरकडे जाण्याचा हा एकमेव मार्ग आहे. त्यात अवजड वाहनांचाही समावेश असतो. त्यामुळे या पुलाची डागडुजी करणे गरजेचे झाले आहे. या पुलाची वैधता शंभर वर्षाची असली तरी सध्या धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.

भारतीय महामार्ग प्राधिकरणाकडे वारंवार या खड्ड्यांच्या संदर्भात तक्रारी केल्या आहेत. त्यांच्या दुरुस्ती संदर्भातील प्रस्ताव तयार झालेला असतानाही संबंधित अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे प्रशासनाने खड्डे न बुजल्यास वेळप्रसंगी आम्ही रस्त्यावर देखील उतरू.
- प्रभाकर जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य, चाळीसगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com