अमळनेर - आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्ह्यात कमीत कमी 50 जागांचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे. तालुक्यातही भाजप विजयी होऊन कमळच फुलणार आहे, असा विश्वास जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी आज येथे व्यक्त केला.
येथील बन्सीलाल पॅलेसमध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी आमदार स्मिता वाघ, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील, तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य ऍड. व्ही. आर. पाटील, जिजाबराव पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, मिलिंद पाटील, सुरेखा पाटील, विनायक बिरारी, भरत ललवाणी, शीतल देशमुख, राकेश पाटील, उमेश वाल्हे, देवा लांडगे, हरचंद लांडगे, डॉ. दीपक पाटील, शत्रुघ्न पाटील आदी उपस्थित होते.
श्री. वाघ पुढे म्हणाले, की शिवसेनेशी युती करण्याबाबत सहकारमंत्री गुलाबराव पाटील यांचा प्रस्ताव आला तर तो स्वीकारू. मात्र, माजी आमदार चिमणराव पाटील यांनी दिलेला युतीचा प्रस्ताव स्विकारणार नाही. आगामी निवडणुका स्वबळावर लढवून सत्ता मिळवायची आहे. आमदार श्रीमती वाघ म्हणाल्या, की पक्ष सोडून जाणाऱ्यांचा विचार करू नका. जाती पातीला थारा न देता चांगले अभ्यासू व्यक्तिमत्वांना निवडून द्या. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. आमदारकीच्या माध्यमातून मी अनेक विकासकामे केली आहेत. तालुका हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्याला शाबूत ठेवण्यासाठी जोमाने कामाला लागावे. माजी आमदार डॉ. पाटील म्हणाले, की सद्यःस्थितीत तालुक्याचे राजकारण बिघडले आहे. पालिकेत राष्ट्रीय पक्षांनी स्वत:च्या चिन्हावर न लढता आघाडीच्या माध्यमातून लढले. केवळ भाजप हा पक्ष चिन्हावर लढला. काही इच्छुकांना तिकीट मिळाले नाही, तर एकमेकांचे पाय ओढू नका. यावेळी अनेक इच्छुक उमेदवार आपल्या समर्थकांसह उपस्थित होते. बाळासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. हिरालाल पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
|