लखनौ: उत्तर प्रदेश विधानसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान बुधवारी (ता. २३) होणार आहे. नऊ जिल्ह्यांमधील ५९ विधानसभा मतदारसंघांत मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. लखनौ, उन्नाव, सितापूर, हरदोई, रायबरेली, फतेहपूर, बाँदा, पिलिभीत आणि लखीमपूर जिल्ह्यातही उद्या मतदान होईल. मात्र, २०१७ प्रमाणेच या निवडणुकीतही काँग्रेसची पिछेहाट होण्याचीच चिन्हे दिसत आहेत. लखीमपूर प्रकरणाचाही काँग्रेसला योग्य फायदा घेता आला नाही. एवढेच नाही तर आपला परंपरागत गड राखण्यातही काँग्रेस यशस्वी होईल, असे दिसत नाही.
उत्तर प्रदेश विधानसभेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत यातील ५९ पैकी ५१ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. लखीमपूर मतदारसंघातही उद्या मतदान होणार आहे. लखीमपूरच्या हिंसाचारानंतर भाजप सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका झाली होती. या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्ष या विषयाचे राजकारण करतील, अशी अपेक्षा होती. मात्र काँग्रेस या संधीचा फायदा घेण्यातही अपयशी ठरली. बहुजन समाज पक्ष या निवडणुकीत फार प्रभावशाली वाटत नसला तरी निकालाच्या आकडेवारीत मात्र दलित मते निर्णायक भूमिका बजावताना दिसतील. शिवाय दोलायमान स्थितीत असलेल्या दलित मतपेढीचा फायदा भाजपला होण्यासाठी खेळी केली जात असल्याची चर्चाही येथे दबक्या आवाजात होत आहे.
ईडीच्या माजी अधिकाऱ्याला भाजपची उमेदवारी
विरोधकांकडून भाजपवर ईडीचा राजकीय लाभाकरिता उपयोग केल्याचा आरोप केला जातो. या निवडणुकीत भाजपने विरोधकांच्या या आरोपाला जणू कबुलीजबाबच लिहून दिला आहे. नगर मतदारसंघातून भाजपतर्फे ईडीचे माजी अधिकारी राजेश्वर सिंग रिंगणात आहेत. त्यांना ‘सप’चे अभिषेक मिश्रा यांचा सामना करावा लागणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.