नागपूर : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यामुळे 10 फेब्रुवारी रोजी आणखी एका व्यक्तिचा मृत्यू झाला. ही बाब गंभीरपणे घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला आणि महापालिकेला दिले. तसेच, सुनावणी दरम्यान वाहतुक पोलिस उपायुक्त चिन्मय पंडीत यांनी शहरातील रस्त्यांचा सर्वेक्षण अहवाल सादर केला. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांची दखल घेत उच्च न्यायालयाने स्वत:च दाखल करुन घेतलेली जनहीत याचिका प्रलंबीत आहे.
मुंढे इफेक्ट - साडेनऊच्या ठोक्याला कर्मचारी हजर!
गिट्टीखदान पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या हजारी पहाड परीसरातून इंदूकला चव्हाण या दुचाकीवर मागे बसून जात होत्या. रस्त्यावरील खड्ड्यामुळे त्या वाहनावरुन पडल्या आणि त्यांचा मृत्यू झाला होता. आज झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयीन मीत्र ऍड. राहील मीर्झा यांनी झालेल्या अपघाताबद्दल उच्च न्यायालयाला माहिती दिली. यापूर्वी, शहरातील खड्ड्यांमुळे एकाचा मृत्यू तर 28 जण जखमी झाले आहे. 7 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश वाहतूक विभागाला दिले होते.
विशेषत: सिव्हिल लाइन्स, कामठी रोड, उप्पलवाडी आणि नरेंद्रनगर येथील खड्ड्यांकडे लक्ष देण्याच्या सूचना आदेशामध्ये दिल्या होत्या. त्यानुसार, वाहतूक पोलीस उपायुक्त चिन्मय पंडीत यांनी शपथपत्र दाखल करीत माहिती दिली. शपथपत्रानुसार, वाहतुकीच्या दृष्टीने सिव्हिल लाईन परीसरामध्ये खड्ड्यांच्या कुठल्याही समस्या आढळून आल्या नाहीत. उत्पलवाडीमध्ये रेल्वे उड्डानपुलाचे काम सुरु आहे. उन्हाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचा मानस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पत्राद्वारे व्यक्त केला आहे. यामध्ये, रस्त्यावरील वाहणाऱ्या पाण्याची सोयसुद्धा करण्यात येणार आहे.
नरेंद्रनगर चौकामध्ये रस्त्याचे काम सुरु असल्याने थोड्याफार प्रमाणामध्ये वाहतुकीची समस्या भेडसावत आहे. या परिसरातील रेल्वे पुलाखाली योग्य सांडपाणी व्यवस्था नसल्याने मोठ्याप्रमाणात पावसाचे पाणी साचते. याचा परिणाम वाहतुकीवर होतो आहे. न्यायालय मीत्र म्हणून ऍड. राहिल मिर्झा यांनी, राज्य शासनातर्फे सुमंत देवपुजारी यांनी, मध्यस्थी याचिकाकर्त्यातर्फे ऍड. एम. अनिलकुमार, ऍड. आकांशा वंजारी यांनी, नागपूर सुधार प्रन्यासतर्फे ऍड. गिरीश कुंटे यांनी आणि महापालिकेतर्फे वरिष्ठ अधिवक्ता एस. के. मिश्रा यांनी बाजू मांडली. या प्रकरणी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या समक्ष सुनावणी झाली.
वाहतुक पोलिस उपायुक्तांच्या अहवालानुसार त्यांनी शहरातील 10 विविध क्षेत्रांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणामध्ये या 10 क्षेत्रातील सुमारे 121 ठिकाणे सदोष आढळले असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे आणि रस्त्याची चाळण झाली आहे. तसेच, खड्ड्यांसंदर्भात नागरिकांकडून 13 नोव्हेंबर 2019 ते 5 जानेवारी 2020 या काळात 91 तक्रारी वाहतूक विभागाला प्राप्त झाल्याची माहिती या अहवालामध्ये दिली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.