ती ठरली एकलव्य! अपघातात गमावला अंगठा, तरी मिळविले चक्‍क एवढे टक्के गुण 

file photo
file photo

नागपूर : अपघाता दीड वर्षापूर्वी उजव्या हाताचा अंगठा गमावला. अंगठाच गेल्याने हातात पेन पकडून पेपर कसा सोडवायचा, असा प्रश्‍न तिच्यासमोर होता. मात्र, परिस्थितीपुढे हार मानायची नाही. तितक्‍याच जोमाने लढायचे, असा दृढनिश्‍चय करून तिने दोन महिन्यांत डाव्या आणि उजव्या हाताच्या तीन बोटांनी लिहिण्यास सुरुवात केली. सुरुवातीला झालेल्या त्रासातून सावरत मेहनतीच्या भरवशावर 96.4 टक्के गुण मिळवत दहावीच्या निकालात ती एकलव्य ठरली आहे. 

नवव्या वर्गात असताना, दीक्षा मंगरानीला एका बाईकस्वाराने धडक दिली. अपघातात तिचा उजव्या हाताचा अंगठा मागच्या चाकात आला. उपचारासाठी तिला दवाखान्यात नेण्यात आले. या वेळी तिच्या अंगठ्याला टाके लावून डॉक्‍टरने लवकरच बरे होईल, असे सांगितले. मात्र, योग्य उपचार न झाल्याने शेवटी अंगठ्याला गॅंगरिन झाल्याने केअर रुग्णालयात उपचार करीत अंगठा कापावा लागला. लिहिताना अंगठा नसल्यास काय होते, याची प्रचिती दीक्षाला येऊ लागली. मात्र, मनाशी ठाम निश्‍चय करून तिने चक्क डाव्या आणि उजव्या हाताच्या बोटांच्या मदतीने लिहिण्यास सुरुवात केली. 

काही महिन्यांतच तिने लिहिण्यात गतीही पकडली. शिवाय एकाच हाताने न लिहिता दोन्ही हातांनी लिहिण्याचे कौशल्यही आत्मसात केले. या कौशल्यातूनच तिने दहावीचा पेपर दिला. त्यात तिने 96.4 टक्‍क्‍यांसह नेत्रदीपक यश मिळविले. आत्मविश्‍वास आणि प्रयत्न केल्याने कशावरही मात करता येते, असे दीक्षाचे म्हणणे आहे. भविष्यात परिश्रमासह तिला प्रशासकीय सेवेत जायचे आहे. दीक्षाचे वडील रमेश मंगरानी ऑटोचालक आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com