४८ वर्षांपासून नाही मिळाला जमिनीचा मोबदला; मग शेतकऱ्याने घेतला हा निर्णय... 

file photo
file photo

टेकाडी (नागपूर) : एमआयडीसीकडून संपादित जमिनीचा मोबदला न मिळाल्याने टेकाडी येथील पीडित शेतकरी अशोक भदूजी हूड यांनी शासनाच्या उदासीन धोरणाला त्रस्त होऊन गुरुवारी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पीडिताच्या कुटुंबाला कोरोना काळात उपासमारीची झळ सोसावी लागत आहे. शासनाने सदर प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. 

पीडिताचा मुलगा प्रवीण अशोक हूड यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९७२ मध्ये (एमआईडीसी) महाऔद्योगिक विकास मंडळ नागपूरद्वारा पीडित शेतकऱ्याच्या वडिलांकडून मौजा टेकाडीस्थित (पूर्वीचा खसरा नं. ४४५/१ ४४५/२) तर नवीन खसरा नंबर ४९३ नुसार ८ एकर १२ आर जमीन अधिगृहित केली होती. ज्याचा मोबदला पीडित परिवाराला अद्याप मिळालेला नाही. मोबदल्यासाठी अशोक हूड यांनी शासन-प्रशासन दरबारी अनेकदा पायपीट केली. 

आमदार, खासदार, पालकमंत्री, उद्योग मंत्री ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्रव्यहार करूनदेखील त्यांची हाक शासन दरबारी पोहोचली नाही. याला ४८ वर्षांचा काळ लोटला आहे. कोरोनाच्या संकटकाळात रोजगार हिरावल्याने कुटुंबाला उपासमारीची झळ सोसवी लागत आहे. या तणावातच अशोक हूड यांनी गुरुवारी कीटकनाशक प्राशन केले. कुटुंबीयांनी त्यांना कामठीस्थित उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 
आजोबांच्या काळापासून अधिग्रहित जमिनीचा प्रश्न आहे. वडिलांनीदेखील संपूर्ण आयुष्य शेतजमिनीच्या प्रकरणात घालविले. पैशांची चणचण असल्याने आमचे शिक्षणही गेले. आमचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा. 
-प्रवीण हूड, पीडित शेतकऱ्याचा मुलगा 

 

(संपादन : मेघराज मेश्राम) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com