स्मारकाची उंची अधिक महत्त्वाची झालीय...

 BABASAHEB PURANDARE
BABASAHEB PURANDARE

नागपूर : इंग्रज अधिकाऱ्याने शिवराज्याविषयी महत्त्वाचे लिखाण केले. त्याच्यासह अनेक इंग्रज अधिकाऱ्यांनी जिजाऊ साहेब व शिवराज्यावर लिहून ठेवले आहे. मात्र, असे लिखाण दुर्दैवाने आपल्याला जमले नाही. आजकाल शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाविषयी नव्हे, तर लोक स्मारकाच्या उंचीबाबत बोलत असल्याची खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्‍त केली.

गायत्रीनगर येथील पर्सिस्टंट सभागृहात साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठानतर्फे "मी पण जिजाऊ' या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी रेणुका देशकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवराज्यातील विविध प्रसंगांचा खुलासा केला. झाशीची राणी लढली तेव्हा ती अवघ्या 23 वर्षांची होती. इतकेच काय तर पुण्यात ओंकारेश्‍वराच्या मंदिराजवळ 70 वर्षांची महिला विसावा संस्था चालवते. आपण प्रत्येकाने तिचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.

आदिलशाही व कुतुबशाहीचे दोन लाखांचे सैन्य निझामशाहीवर चालून आले. निझामाने शहाजी राजांना तीस हजारांचे सैन्य देऊन दोन लाखांच्या सैन्याशी युद्ध करण्याचे आदेश दिले. हे दोन लाखांचे सैन्य अहमदनगर येथे नदीकाठी विश्रांतीसाठी थांबले असताना शहाजी राजांनी नदीवरील बंधारा रात्रीच्या काळोखात फोडला. बघता बघता दोन लाखांचे सैन्य वाहून गेले. स्वत:च्या एकाही सैन्याचा प्राण जाऊ न देता निझामाच्या या बादशहाने अर्थात शहाजीराजांनी दोन लाखांचे सैन्य संपविले. त्यांची कीर्ती, त्यांचे चातुर्य आणि त्यांच्या मुत्सद्दी स्वभावाचाच परिणाम सहा वर्षांनी जन्मास आलेल्या शिवाजी राजांवर झाला असल्याचे पुरंदरे यांनी सांगितले.

बादशहाने जिजाबाईंच्या दोन सख्ख्या भावांना भर दरबारात ठार मारले. जिजाबाईंच्या काळजातील हा भडका त्यांनी प्रेरणेच्या रूपाने बाहेर काढला. प्रेरणेची ज्योत हृदयातून पेटावी लागते. तेव्हाच इतिहास घडतो. जिजाबाईंनी माणसे जोडणे म्हणजे संपत्ती जमा करण्यासारखे समजले. त्या हिंदवी स्वराज्याच्या कुशल संघटक होत्या, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.

आदिलशाहीत सरदार असलेल्या शहाजी राजांना मुलाने स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला म्हणून अटक झाली होती. कुंकू हवे की स्वराज्य, असे बादशहा जिजाबाईंना विचारत होता. तरीही बोटांवर मोजण्याइतपत मराठ्यांच्या मदतीने जिजाबाईंनी स्वराज्य निर्माण केले. उद्‌ध्वस्त पुण्याचे नंदनवन केलेच, शिवाय झपाट्याने माणसे जोडली. खरे बघता जिजाऊ हिंदवी स्वराज्याच्या संघटक होत्या, असे पुरंदरे म्हणाले.

बादशहाने शहाजी राजांना केलेली अटक, कोंढाण्याच्या तहात वटपौर्णिमेच्या दिवशी शहाजी राजांची झालेली सुटका अन्‌ छत्रपती शिवाजी राजांसोबत जिजाबाईंचे झालेले लिखाण साऱ्यांचीच यथासांग माहिती याप्रसंगी श्रोत्यांना ऐकण्याचे भाग्य मिळाले. उद्‌ध्वस्त पुणे सुधरण्यास तेव्हापासून प्रारंभ झाला, असे सांगून बाबासाहेबांनी चेहऱ्यावर अलगद हास्य फुलवले अन्‌ सभागृहात हशा पिकला.

आता खरा विषय सुरू झाला
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे शहरात अनेक कार्यक्रम झाले. मात्र, शनिवारी झालेला कार्यक्रम खऱ्या अर्थाने फलदायी ठरला. कारण, बाबासाहेब मनसोक्तपणे आणि विनोदी शैलीने प्रत्येक प्रश्‍नास उत्तर देत होते. शिवराज्याचे संदर्भ तर होतेच, मात्र त्यात आजच्या सासू-सुनांच्या भांडणाचे विषय, नवऱ्यावर बायकोचा प्रहार, असे अनेक विनोद त्यांनी केले. अर्धी मुलाखत आटोपल्यानंतर खरा विषय आत्ता सुरू झाला, असे पुरंदरे म्हणाले अन्‌ सभागृह खदखदून हसले. आतापर्यंत काय थापा मारल्या का, असे तुम्ही विचारणार असाल तर पुणे भारतात नाही का, असा प्रतिप्रश्‍न करेल, असेदेखील विनोदी शैलीत पुरंदरे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com