नागपूर : एका ठिकाणी केलेली चाचणी निगेटिव्ह तर दुसऱ्या ठिकाणी केलेली चाचणी पॉझिटिव्ह येत असल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण झाला असून यावर आज महापौर संदीप जोशी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शास्त्रीय कारणे जाणून घेतली. पॉजिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची चाचणी निगेटिव्ह जरी आली असेल तरी संबंधिताने स्वतःला विलगीकरणात ठेवावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांंनी केले.
महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेखाली महापौर कक्षात झालेल्या बैठककीत ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाने, उपायुक्त निर्भय जैन, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई उपस्थित होते. यावेळी महापौरांंनी पुण्याच्या धर्तीवर व्हिटॅमिन सी आणि डी च्या गोळ्या नागरिकांना वितरीत करता येतील का, याबाबतही माहिती जाणून घेतली.
औरंगाबाद येथे गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांवर देखरेख ठेवण्यासाठी तसेच तपासणी करण्यासाठी खासगी डॉक्टरांची चमू तयार करण्यात आली आहे. त्यासाठी केवळ १० हजार रुपये आकारले जातात. असा पॅटर्न नागपुरातही राबविता येईल का? याबाबत विचार करून निर्णय घेण्याचे निर्देश महापौरांनी दिले.
गृह विलगीकरणातील रुग्ण बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी सामाजिक संस्थांनी केल्या आहेत. यावर तातडीने आरआरटी पथकाच्या माध्यमातून कार्यवाही करावी, असे निर्देशही महापौर संदीप जोशी यांनी दिले. कोव्हिड-१९ संक्रमणाच्या सुरुवातीच्या काळापासून काम करणाऱ्या आशा वर्कर्सला मनपाकडून वाढीव प्रोत्साहन भत्ता देता येईल का, याचीही तपासणी करण्याची सूचना त्यांनी केली.
कोव्हिड-१९ विषाणूचे संक्रमण झाले अथवा नाही हे तपासण्यासाठी ‘ॲण्टीजिन टेस्ट’ व ‘आरटी-पीसीआर टेस्ट'`अशा दोन चाचण्या असल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई यांनी सांगितले. यातील ॲण्टीजिन टेस्ट ही रॅपिड टेस्ट आहे. एखादे प्रतिबंधित क्षेत्र असेल, हाय रिस्क पेशंट असेल, अथवा चाचणी अत्यंत तातडीने करवून घ्यायची असेल तर ॲण्टीजिन टेस्ट करण्यात येते. या चाचणीत पॉजिटिव्ह आलेला रुग्ण पॉजिटिव्हच असतो. त्यानंतर आरटी-पीसीआर टेस्ट करण्याची गरज नाही. परंतु ॲण्टीजिन टेस्टमध्ये व्यक्ती निगेटिव्ह आला तर त्याने आर.टी.-पीसीआर टेस्ट करणे आवश्यक असल्याचे डॉ. सवाई म्हणाले.
ॲण्टीजिन टेस्टमध्ये लक्षणे असतानाही निगेटिव्ह आलेल्या व्यक्तीने आरटी-पीसीआर चाचणी करून घेणे आवश्यक आहे. आरटी-पीसीआर टेस्टमधून निश्चित निदान होते. पॉजिटिव्ह व्यक्तीच्या शरीरात पुढील ६० दिवसापर्यंत विषाणू असू शकतात. तो पुढेसुद्धा पॉजिटिव्ह येईल. कोरोना लक्षणांच्या दोन दिवसाआधी व लक्षणांच्या पाच दिवसानंतर, असे सात दिवस कोरोनाबाधित व्यक्ती विषाणूचा संसर्ग पसरवू शकतो. सातदिवसानंतर त्याला पुढील तीन दिवसांत लक्षणे नसल्यास त्याच्याकडून विषाणूचा संसर्ग इतरांना होणार नाही. त्यामुळे लक्षणे नसलेल्या पॉजिटिव्ह व्यक्तींना दहा दिवसानंतर घरी सोडण्याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. सवाई यांनी सांगितले.
संपादन - अथर्व महांकाळ
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.